Sunday, July 12, 2026

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना प्राधान्य ३ आरोबी, ४ सबवे व अंडरब्रिजचे लोकार्पण 
नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उडाण पुलाच्या बांधमांना प्राधान्य देण्यात येत असून, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज येथे केली. वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रोड, ओवर ब्रिज तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेड [महारेल] यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते, तर यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल, दयाशंकर तिवारी, महानगरपालिकेचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.(Nagpur News)
रेल्वे फाटका अभावी दरवर्षी २१ हजार लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून त्यापैकी १० हजार पेक्षा जास्त दळणवळणातंर्गत असलेल्या १२१ फाटकासोबतच इतरही १४५ रेल्वेवरील पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली असून हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षात महारेलतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामसाठी महारेलची स्थापना केल्यामूळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे.  नागपूरसह मुंबईतील अतिशय कठीण पुलांच्या बांधकामांचे नियोजनबद्व काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले आहे. महारेल्वेने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून यासाठी पेटेंटसुध्दा मिळविले आहे. कामाची गती व कमी खर्चात कामाचा दर्जा राखत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.
नागपूर शहराच्या तसेच रस्त्याच्या विकासासाठी मोठया प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरु असल्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या असून मोठया प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. त्यामुळे सामाजिक व आर्थिक विकास होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्ग या रेल्वे ओव्हर ब्रिजला माजी उपमहापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उडाण पुलाच्या सोबतच येथील व्यावसायीकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसेच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असून या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयाच्या खर्चापैकी ४० कोटी रुपयाचा निधी एनएचआय(NHI) तर्फे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पूर्व नागपूर परिसरात मोठया प्रमाणात शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या असून कचऱ्‍यापासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरु होत आहे. महारेल तर्फे  मोठया प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरु असून अत्यंत जलद गतीने पूर्ण होत आहे. मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. महारेलचे महाव्यवस्थापक  राजेशकुमार जयस्वाल यांनी  महारेल तर्फे राज्यात सुरु असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक , सांगली, नागपूर , चंद्रपूर जिल्हयातील तीन रोड ओव्हर ब्रिज ४ सबवे आणि एक रोड अंडरब्रिज या प्रकल्पाचा समावेश असल्याचा त्यांनी सांगितले. या प्रकल्पावर ४८४ कोटी रुपये खर्च झाला असून नागपूर येथील दोन प्रकल्प केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधाअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. सात प्रकल्प रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ५०:५० खर्च वाटपाच्या तत्वावर पूर्ण करण्यात आले आहे. जितेंद्रकुमार शर्मा यांनी आभार मानले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >