पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये कोसळलेल्या प्रशासकीय इमारतीच्या दुर्घटनेतील बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू असून, शनिवारी ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. बचावकार्याला होत असलेल्या विलंबामुळे घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांच्या भावनांचा बांध फुटला असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत १४ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी, अद्याप ७ कामगार आत अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र, या दुर्घटनेने सावंत कुटुंबावर कधीही न भरून येणारा आघात केला आहे. या कुटुंबाचा मुख्य आधार असलेला तरुण मुलगा, अक्षय सावंत याचा या ढिगाऱ्याखाली दबून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुखी संसाराच्या स्वप्नांचा अवघ्या दोन महिन्यांत चुराडा
अक्षय सावंत हा अवघा ३३ वर्षांचा तरुण होता. नुकत्याच सुरू झालेल्या त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळत होती; अवघ्या एका महिन्यापूर्वीच तो या मोशी कचरा डेपोमध्ये नोकरीला लागला होता. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याची लग्नगाठ बांधली गेली होती. नवी नोकरी आणि नवीन सहचारिणी यामुळे तो एका सुखी संसाराची सोनेरी स्वप्ने विणत होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ८ जुलै रोजी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अक्षय कामावर गेला. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने पत्नीशी फोनवर संपर्क साधला आणि आपण जेवणासाठी जात असल्याचे सांगितले. पत्नीसोबतचे त्याचे हेच शेवटचे बोलणे ठरले; कारण त्यानंतर त्याचा फोन कायमचा बंद झाला.
व्हिएतनाम : व्हिएतनाममधील (Vietnam boat accident)अतिशय लोकप्रिय अशा 'फू क्वोक' (Phu Quoc) बेटाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांवर मोठा अनर्थ ओढवला आहे. एका भीषण दुर्घटनेत ...
आई ४ दिवस उपाशी; लेकाची वाट पाहतानाच ओढवला अनर्थ
पतीशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या पत्नीने वारंवार फोन लावून पाहिला, मात्र तो बंदच लागत होता. मोबाईलचे लोकेशन मात्र मोशी कचरा डेपोच दाखवत होते. इकडे इमारत कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आपला अक्षय ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजताच त्याच्या आईने थेट घटनास्थळी धाव घेतली. सलग चार दिवस अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही न घेता ही माऊली तिथेच डोळ्यांत प्राण आणून बसली होती. 'माझा लेक सुखरूप बाहेर येईल' हीच एक भाबडी आशा तिला होती. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही या आईने आपला मुलगा जिवंत असेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, ज्यावेळी ती लेकासाठी व्याकुळ होऊन वाट पाहत होती, तेव्हाच अक्षयने या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.
मदतीची घोषणा, पण कंपनीची उडवाउडवीची उत्तरे
या एका दुर्घटनेने एका आईच्या कुशीतला लेक हिरावून घेतला आणि लग्नाला दोन महिने पूर्ण होण्याआधीच एका नवविवाहितेचे कुंकू पुसले गेले. त्यांचे हे दुःख शब्दांत न मांडता येणारे आहे. दरम्यान, या हृदयद्रावक घटनेनंतर संबंधित कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र, अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, कंपनीचे अध्यक्ष महेंद्र अनंतुला यांनी या भीषण दुर्घटनेला 'अॅक्ट ऑफ गॉड' (Act of God) म्हणजेच नैसर्गिक आपत्ती म्हटले आहे.






