Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार



मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने राज्यात राबविलेल्या धडक भेसळविरोधी मोहिमेनंतर आणि वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाऱ्यांच्या धसक्यामुळे राज्यातील दूध संघांमधील दूध संकलनात तब्बल २० ते २५ टक्क्यांची घट झाली असल्याची कबुली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ  (Narhari Zirwal) यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. दुधातील जीवघेण्या भेसळीचा हा मुद्दा सभागृहात गाजत असतानाच, खुद्द विधानभवनात आमदारांच्या जेवणात माशी सापडल्याचे उघडकीस आल्याने आता विधिमंडळ परिसरात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.



विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जालना जिल्ह्यातील बनावट तुपाच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावरील चर्चेत उपप्रश्न विचारताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधातील भेसळीचा गंभीर प्रकार सभागृहासमोर आणला. पडळकर म्हणाले की, "एका शेतकऱ्याच्या गोठ्यात एकही जनावर नसताना त्याच्याकडून दररोज दूध संघात १५० लिटर दूध पाठवले जात होते. पश्चिम महाराष्ट्रात किंवा अन्य ठिकाणी असलेल्या दूध संघांमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई होण्यापूर्वी किती दूध येत होते आणि कारवाई सुरू झाल्यावर त्यात किती तफावत पडली, याचा रेकॉर्ड तपासला पाहिजे. माझ्या जिल्ह्यातील बऱ्याच दूध संघांमध्ये दुधापासून इतर उपपदार्थ तयार करणे आता कमी झाले आहे. दुधात युरिया मिसळणारे हे नराधम महाराष्ट्रातील करोडो लोकांच्या जीवाशी खेळत असून, तपासणीत दोषी आढळणाऱ्या दूध संघांच्या मालकांवर सरकार काय कारवाई करणार?", असा सवाल त्यांनी केला.


यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, "ज्या दिवसापासून विभागाने भेसळविरोधी कठोर कारवाई सुरू केली आहे, तेव्हापासून दूध संकलनात २० ते २५ टक्क्यांची घट झालेली दिसून आली आहे. यावरून भेसळीचे प्रमाण स्पष्ट होत असून, तपासणीअंती दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत," असे त्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील 'मे. मुंदडा इंडस्ट्रीज' या तुपाच्या कारखान्यावर अचानक छापा टाकून १३ लाख ४ हजार ५४९ रुपयांचा बनावट तुपाचा साठा जप्त केल्याचा हवाला आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला होता. अशा भेसळखोरांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळण्याबाबत सरकार नवीन कायदा करणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर मंत्री झिरवाळ म्हणाले, "संबंधित कंपनीविरोधात कलम २७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार १ लाख रुपये दंडापासून ते थेट मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असून ती लागू केली जाईल. भेसळखोरांसाठी सद्यस्थितीत असलेले कायदे पुरेसे कठोर आहेत; परंतु त्यांची नीट अंमलबजावणी होत नसल्यामुळे अडचण होते," अशी कबुलीही त्यांनी दिली. तसेच मुंदडा कंपनीच्या मालकाचा परवाना रद्द करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत आमदार अर्जुन खोतकर, किशोर आप्पा पाटील, सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.




आमदाराच्या जेवणात माशी



दुध आणि तुपाच्या भेसळीची चर्चा सुरू असतानाच आमदार विकास ठाकरे यांनी विधानभवनातील अन्न सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. "विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून येथे सर्व २८८ आमदार उपस्थित आहेत. दुपारी प्रत्येकजण विधानभवनाच्या परिसरातच जेवणासाठी जातो. मात्र, येथील अन्न सुरक्षित आहे का? आमच्या पक्ष कार्यालयात आमदार अमित झनक जेवत असताना त्यांच्या जेवणात चक्क माशी आढळली. त्यामुळे विधानभवन परिसरात येणाऱ्या अन्नाची दर्जा चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी ठाकरे यांनी केली. आमदारांच्या आरोग्याशी संबंधित या विषयाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, या प्रकरणाची विधिमंडळ स्तरावर चौकशी करून तातडीने उचित उपाययोजना करण्याचे आश्वस्त केले.

Comments
Add Comment

Maharashtra Political News : आमदार बच्चू कडू यांच्याकडून मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग

 सभापतींनी मागवला खुलासा; संगणक परिचालकांचा मुद्दा विधान परिषदेत गाजला मुंबई (Mumbai): ग्रामपंचायत संगणक

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :

Devendra Fadnavis : नाशिकमधील जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी 'एसआयटी'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या