मुंबई : राज्यातील अनेक भागांसह मुंबईत सध्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे (Alerts) काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसासह वादळ येण्याची दाट शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्याच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार
सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक तसेच पुण्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या अनुषंगाने प्रशासनाने कालपासूनच विविध सतर्कतेचे इशारे (Alerts) जारी केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व परिसरांमध्ये ६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या तुकड्या सज्ज असून ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून दर तीन तासांनी हवामानाच्या अंदाजाचे एसएमएस (SMS) पाठवले जात आहेत. त्यामुळे अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि शक्यतो आपला प्रवास टाळावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अमेरिका: फिफा विश्वचषक २०२६ आता आपल्या अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. काल पार पडलेल्या 'राऊंड ऑफ ३२'च्या अटीतटीच्या सामन्यांनंतर स्पर्धेतील ...
मुंबई, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'
दुसरीकडे, मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा 'रेड अलर्ट' (Red Alert) दिला असून, या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उपनगरांमध्ये, विशेषतः वसई, विरार आणि नालासोपारा येथे पावसाचा जोर अधिक असून, नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी कंबरेइतके पाणी साचल्याचे चित्र आहे. त्यातच दुपारी दोनच्या सुमारास समुद्राला भरती असल्याने, पावसाचा जोर असाच राहिल्यास सखल भागात पाणी साचून मुंबईकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
मुंबईत शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर
मुसळधार पावसाच्या या इशाऱ्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शनिवारी एक मोठा निर्णय घेतला. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सर्व महानगरपालिका आणि संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सकाळच्या सत्रात शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने हा सावधगिरीचा उपाय योजला आहे.