नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटनपटूंना जागतिक स्तरावरील आगामी बदलांसाठी सज्ज करण्यासाठी, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (Badminton Association of India) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै २०२६ पासून देशांतर्गत स्पर्धांमध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची नवीन '३x१५' स्कोअरिंग पद्धत लागू केली जाणार आहे. याची सुरुवात ७ ते १४ जुलै २०२६ या काळात एर्नाकुलम (केरळ) येथे होणाऱ्या 'योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन टूर्नामेंट'पासून होईल.
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने जानेवारी २०२७ पासून ही पद्धत जागतिक स्तरावर लागू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याआधीच भारतीय खेळाडूंना या नव्या स्वरूपाची सवय व्हावी आणि त्यांना तांत्रिक व शारीरिकदृष्ट्या तयार राहता यावे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. ही नवीन पद्धत केवळ वरिष्ठ स्तरावरच नव्हे, तर झोनल चॅम्पियनशिप, रँकिंग टूर्नामेंट्स आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये (अंडर-११ ते सिनियर आणि मास्टर्स/व्हेटरन्स) अनिवार्य असेल. यामुळे संपूर्ण भारतीय बॅडमिंटन इकोसिस्टममध्ये एकवाक्यता येईल. या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस संजय मिश्रा म्हणाले, "बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया जानेवारी २०२७ पासून ही पद्धत लागू करणार आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी यांना या बदलाची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून आम्ही त्याची लवकर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सर्व वयोगटातील खेळाडूंना नवीन फॉरमॅटची सवय होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संक्रमण अधिक सुलभ होईल." (Badminton New Rules)
या बदललेल्या स्वरूपामुळे खेळाची तीव्रता वाढणार असून, खेळाडूंना आता अधिक तांत्रिक अचूकता आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेवर भर द्यावा लागणार आहे.
नवीन पद्धतीचे स्वरूप:
स्कोअरिंग बदल: आता सामने 'बेस्ट ऑफ थ्री' फॉरमॅटमध्येच खेळले जातील, पण प्रत्येक गेम २१ ऐवजी १५ गुणांचा असेल.
निकाल: १४-१४ गुणांवर पोहोचल्यानंतर २ गुणांची आघाडी घेणे अनिवार्य असेल. तसेच, गुण २०-२० झाल्यानंतर पुढील गुण मिळवणारा खेळाडू विजेता ठरेल.
इंटरव्हल: खेळाडू किंवा जोडी ८ गुणांवर पोहोचल्यावर 'मिड-गेम इंटरव्हल' असेल. तिसऱ्या गेममध्ये साईड बदलण्यासाठी ६० सेकंदांचा ब्रेक मिळेल. दोन गेम्समधील १२ नो-सेकंदांचा ब्रेक कायम असेल.