जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै
क्रियमाण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असणार. याचे अगदी साधे सरळ सोपे उत्तर म्हणजे प्रारब्ध भोगत असताना आपण ज्या क्रिया करतो, जे कर्म करतो, जी कृती करतो त्यालाच क्रियमाण म्हणतात. हे क्रियमाण कोणीही टाळू शकत नाही. किंबहुना प्रत्येकाला, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला क्रियमाण हे करावेच लागते. आपण क्रियमाण करीत असताना एका बाजूने प्रारब्ध भोगत असतो व दुसऱ्या बाजूने त्याच वेळी नियती निर्माण करत असतो. ही जी नियती आहे त्यातून सुखदुःख निर्माण होते. मी हे करणार नाही असे जर कोणी म्हणून टाळायचा प्रयत्न करेल तर तसे चालणार नाही, किंबहुना तसे योग्य नाही. कारण देवाने पोट दिलेले आहे व ते भरलेच पाहिजे नाही तर उपाशी मरायची वेळ येईल. देवाने दिलेले पोट भरायला हवे तर काम हे करायला हवे. काही ना काही तरी काम हे करायलाच हवे. पोट कशासाठी दिले तर माणसाने केवळ स्वस्थ बसू नये यासाठी! माणसाने प्रयत्न करीत राहिले पाहिजे. कर्म करीत राहिले पाहिजे यासाठी देवाने माणसाला पोट दिले आहे. क्रियमाण हे प्रारब्ध भोगताना पोट भरण्यासाठी व जीवन जगण्यासाठी केलेच पाहिजे. प्रारब्ध भोगणे हा भाग महत्त्वाचा नाही, तर क्रियामाणातून नियती निर्माण करणे हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून क्रियमाणाचे हे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. कर्म करणे म्हणजे क्रियमाण! हे कर्म किती प्रकारचे आहेत? चार प्रकारचे आहे. ब्रह्मदेवाला तोंडे किती? चार! तसे कर्म हे ब्रह्मदेवच आहे. ह्या कर्माला चार तोंडे आहेत. विचार, इच्छा, उच्चार व आचार. ही चार तोंडे कर्माला आहेत म्हणून कर्म हे ब्रह्मदेव आहे. ह्या ब्रह्मदेवाची उपासना केली पाहिजे. ब्रह्मदेवाचे देऊळ पृथ्वीवर एकच आहे असे म्हणतात. असो. ही कर्माला जी चार तोंडे आहेत, ह्यातले पहिले तोंड म्हणजे विचार! विचार जीवनाला आकार देतात. जसा कुंभार मातीला आकार देतो व भांडी बनवितो तसा विचार हा कुशल कुंभार आहे व हा विचार आपले जीवन घडवितो किंवा बिघडवतो! दोन्ही आहे. जीवन घडवितो किंवा जीवन बिघडवितो म्हणून विचार ही शक्ती आहे व ती प्रचंड आहे. हा विचार डोळ्यांना दिसत नाही; परंतु तो आहे. आपण जिथे जातो तिथे तो आपल्या बरोबर असतो. "जिथे जातो तेथे तू माझा सांगाती!" कुठेही जा, तो तुमच्या बरोबर असणारच. जसा तुमचा श्वास तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर असतो. अगदी स्मशानात गेलात तरी तिथे तो असतो. स्मशानात म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पोहोचवायला. मेलेल्या माणसाला पोहोचवायला दुसरे लोक जातात तसे स्मशानात गेलात तरी आपला श्वासोच्छ्वास चाललेला असतो. तसे विचारांचे आहे. तुमचे विचारही सतत सर्वत्र तुमच्याबरोबर असतात.