sachin Ahir : वरळीत आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा

- सचिन अहिरांमुळे वाढले एकनाथ शिंदेंचे बळ; कामगार वर्गाची मोठी ताकद महायुतीकडे



मुंबई : उबाठा गटाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या (शिंदे) वतीने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने मुंबईच्या, विशेषतः वरळी (Worli) विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांत मोठा बदल झाला आहे. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघ सोडणारे आणि त्यांच्या विजयात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावणारे सचिन अहिर महायुतीच्या गोटात गेल्याने ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. अहिरांच्या या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळ कमालीचे वाढले असून, मुंबईतील कामगार वर्गाची मोठी ताकद आता महायुतीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी वरळीचे तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सचिन अहिर यांनीही आदित्य ठाकरेंना मदत करावी, अशी गळ मातोश्रीकडून घालण्यात आली होती. आदित्य ठाकरेंना भविष्यात कोणताही त्रास होऊ नये आणि वरळीवर पकड राहावी, या उद्देशानेच मातोश्रीने सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोघांनाही विधान परिषदेची आमदारकी दिली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली असताना, अहिर यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आदित्य ठाकरेंचा विजय सुकर केला होता.



खरे तर यापूर्वीही सचिन अहिर यांनी शिवसेनेत यावे म्हणून महायुतीच्या बड्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली होती; त्यांना मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी मातोश्रीवरील निष्ठा कायम ठेवली होती. आता मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात एकनाथ शिंदेंनी अहिर यांना उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली आहे. राजकीय गणितांनुसार, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या विरोधात थेट सचिन अहिर यांनाच मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहिर स्वतः उमेदवार नाहीत आणि त्यांनी महायुतीला पडद्यामागून मदत केली, तरीही आदित्य ठाकरेंना वरळीची निवडणूक अत्यंत जड जाणार आहे. याशिवाय, मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास वरळीचे तुकडे करून आदित्य ठाकरेंना घेरण्याची रणनीतीही महायुतीकडून आखली जाऊ शकते.




२०२९ ला विधानसभा की लोकसभा?



गेल्याच आठवड्यात उबाठा गटाच्या ६ खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उबाठाला मोठे भगदाड पडले होते. हा धक्का ताजा असतानाच, आता सचिन अहिर यांच्या पाठोपाठ उबाठा गटाचे विधानसभेतील आणखी १४ ते १५ आमदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सचिन अहिर हे राज्यातील महत्त्वाचे कामगार नेते आहेत. त्यांची स्वतःची कामगार संघटना असून, गिरणगाव, भायखळा आणि वरळी परिसरातील कामगार वर्गात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांची ही ताकद महायुतीला २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईत मोठे यश मिळवून देऊ शकते. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्याविरोधातही अहिर यांच्या नावाचा विचार महायुतीकडून होऊ शकतो.




आमदार सुनील शिंदेंची भूमिका निर्णायक



सचिन अहिर यांच्या या निर्णयानंतर आता वरळीतील उबाठा गटाचे दुसरे आमदार सुनील शिंदे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुनील शिंदे यांच्यासह चार आमदार अनुपस्थित होते. आपण गावाला गेलो असल्याने मुंबईत पोहोचू शकलो नाही, असा खुलासा सुनील शिंदे यांनी केला असला, तरी सचिन अहिर यांच्या बंडानंतर आता सुनील शिंदे नेमकी काय भूमिका घेतात आणि ते उबाठा गटासोबत राहतात की महायुतीचा रस्ता धरतात, यावर वरळीतील उबाठा गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.




कोण आहेत सचिन अहिर?



- सचिन अहिर हे कुख्यात डॉन अरुण गवळी यांचे सख्खे भाचे आहेत. अरुण गवळी यांच्या बहीण आशालता यांचे ते पुत्र आहेत.
- त्यांनी १९९३ मध्ये 'राष्ट्रीय मिल कामगार संघटने'च्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केली. आधी सचिव आणि नंतर या संघटनेचे ते अध्यक्ष झाले. याशिवाय माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा युनियनचे नेतृत्व करत त्यांनी कामगारांच्या पगारवाढीसाठी अनेक आंदोलने केली.
- १९९९ ते २०१९ या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. २००९ मध्ये त्यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले.
- पुढे राष्ट्रवादी सोडून त्यांनी संयुक्त शिवसेनेत प्रवेश केला. तेथे त्यांना उपनेतेपद देण्यात आले. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर, सचिन अहिर यांच्या पत्नी 'संकल्प प्रतिष्ठान' चालवतात.

Comments
Add Comment

Uday Samant : पाषाण तलाव सांडपाणी प्रकल्पातील त्रुटींची होणार चौकशी!

१५ दिवसांत केंद्र सुरू न केल्यास पिंपरी-चिंचवडमधील इतर सोसायट्यांचेही नळ कनेक्शन कापणार - मंत्री उदय

Pratap Sarnaik : HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; परिवहन विभाग आणि ट्रॅफिक पोलीस करणार संयुक्त कारवाई

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हाय-सिक्युरिटी प्लेट बंधनकारक; एजंटच्या आमिषाला बळी न पडण्याचे परिवहन मंत्री

Under-19 Rowing Championship : पिंपरी-चिंचवडमध्ये होणार रोईंग वर्ल्ड कप; स्पर्धेसाठी १० कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी

रोईंग वर्ल्ड कप अंडर-19, अंडर-23 स्पर्धा पिंपरीत; सुनेत्रा पवार यांच्याकडे आर्थिक सहाय्याची मागणी मुंबई : रोईंग

Dance Bar: आर्केस्ट्रा बारमधील 'छमछम' बंद

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; डान्सबार प्रतिबंधक कायद्यातून पळवाटा शोधणाऱ्यांना दणका मुंबई :

CM Devendra Fadnavis : महावितरणचे खासगीकरण होणार नाही!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; राज्यातील वीज दरांबाबत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू मुंबई : राज्य

HSRP Registration Plate : राज्यात केवळ ४९ टक्के वाहनांवर 'एचएसआरपी' नंबर प्लेट

- उद्यापासून १ हजार रुपये दंड; मुदतवाढ मिळणार नसल्याचे परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट मुंबई : राज्यातील जुन्या