Ahilyanagar : जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) मोठी धडक कारवाई करत एकाच दिवशी ६५ जणांना सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना रंगेहाथ ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) यांच्या आदेशानुसार जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या मेगा ऑपरेशनमुळे अंमली पदार्थ विक्रेते आणि नशेखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
माणगाव, पोलादपूर आणि रत्नागिरी क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांना गती देणार - मंत्री अदिती तटकरे मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ...
पोलिसांनी घेतली तक्रारींची दखल
जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, निर्जन रस्ते, रेल्वे स्टेशन परिसर, महाविद्यालयांच्या आजूबाजूचे भाग तसेच काही ढाब्यांच्या मागील परिसरात खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना एकाच वेळी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस ठाण्यांची गुन्हे शोध पथके, विशेष पथके आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे कोंबिंग ऑपरेशन (Combing operation) , नाकाबंदी आणि अचानक छापेमारी केली. या कारवाईत विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना आढळलेल्या ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यासह इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून गांजा तसेच सेवनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
परीक्षांचे खाजगीकरण होणार नाही; मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी भरती ...
आता पुरवठा करणाऱ्या साखळीवर लक्ष
या कारवाईनंतर पोलिसांनी आता अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांबरोबरच त्यांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीवर लक्ष केंद्रित केले आहे. शहर व जिल्ह्यात गांजा तसेच इतर अंमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा करणाऱ्यांचा शोध सुरू असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे. तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात अशाच प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
तोफखाना आणि श्रीगोंद्यात सर्वाधिक धाडी
या मेगा ऑपरेशनदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला, शाळांच्या परिसरात आणि इतर ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तोफखाना (Topkhana Police Station) आणि श्रीगोंदा पोलिस ठाण्यांच्या (Shrigonda Police Station) हद्दीत प्रत्येकी ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तर एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) स्वतंत्र कारवाई करत गांजा ओढणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.






