PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. 'कॅच द रेन' हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाही. त्यामुळे, पावसाचा थेंब अन् थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. 'मन की बात'च्या (Man Ki Baat) १३५ व्या भागात त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.


मोदी पुढे म्हणाले की, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्नसोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचे उत्सव बनलेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे, जे चर्चेचा विषय बनलं आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहते. या कुटुंबाला वाटलं की, जर आनंद वाटून घ्यायचाच असेल, तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं, या कुटुंबानं गावातल्या सुमारे साडेतीन हजार लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला एक लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. (PM Narendra Modi)



अनेक लोकांनी मला पत्र लिहून 'गणेशोत्सवा'शी संबंधित विषयावर बोलण्याची सूचना केली. तसं पाहिलं तर 'गणेशोत्सवा'ला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर, गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम खूप आधीपासूनच सुरू होतं. मूर्ती बनवणारे, मूर्तींच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझा तुम्हा सर्वांना एक आग्रह आहे. तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल, ती आपल्या देशाच्या मातीपासून बनलेली असावी, ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती बनवतात, त्यांनाही माझी विनंती आहे की, त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं. जे लोक मूर्ती खरेदी करतात, त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून बनली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे, हे नक्की पहावं. 'प्लास्टर ऑफ पॅरिस'पासून बनलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो, तेव्हा आपण 'व्होकल फॉर लोकल'चा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या 'गणेशोत्सवात' आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू, याची मला खात्री असल्याचे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi)


२०२६ चं अर्ध वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे. सोबतच हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. सी-२९५ विमान 'मेड इन इंडिया' असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी ४० विमानं तयार केली जात आहेत. यामुळे एमएसएमई आणि एअरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्पदेखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDOने स्वदेशी '‘Long Range Land Attack Cruise Missile’'चीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच, आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. (PM Narendra Modi)



नुकताच 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं. यावेळी जगभरात २५०० हून अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योगविद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या 'जागतिक योगासन स्पर्धे'चीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण ११४ पदकं जिंकली, ज्यात १०२ सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विजयी खेळाडूंचं पंतप्रधानांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. (PM Narendra Modi)


Comments
Add Comment

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी