पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेली 'शिक्षक पात्रता परीक्षा' (TET) अचानकपणे पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी तब्बल ६ लाख १२८ विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, परीक्षेच्या अवघे काही तास शिल्लक असतानाच हा निर्णय जाहीर झाल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिवंडीत नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे एक पत्र वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे, ज्यात या पेपरफुटीचा खळबळजनक उलगडा करण्यात आला आहे. आज (२७ जून) पहाटे भिवंडीत एक मोठी पोलीस कारवाई पार पडली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी काही संशयितांवर पहाटे सकाळीच धाड टाकली. या कारवाईत संशयितांकडे उद्या होणाऱ्या 'टीईटी' परीक्षेतील काही प्रश्न हुबेहूब जुळत असल्याचे आढळून आले. तातडीने परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून याची पडताळणी करण्यात आली आणि प्रश्न समान असल्याचे निष्पन्न झाले. या धक्कादायक प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'NEET' च्या धसक्यानंतर प्रशासनाची खबरदारी
देशात नुकत्याच उघडकीस आलेल्या 'NEET 2026' परीक्षेतील महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेने आधीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. राज्यात एकूण १,०२८ (काही अधिकाऱ्यांच्या मते १,७२८) केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार होती. मात्र, भिवंडीतील या प्रकारानंतर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक वातावरणातच पार पडावी आणि या पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने उद्याची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघा ...
परीक्षा परिषदेच्या उपायुक्त काय म्हणतात ?
या सर्व गोंधळावर पडदा टाकत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "राज्यभरातील हजारो केंद्रांवर ६ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार होते आणि सर्व अधिकारी पूर्वतयारीसाठी केंद्रांवर उपस्थित होते. मात्र, काही 'तांत्रिक कारणास्तव' ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख आणि वेळ लवकरच विद्यार्थ्यांना अधिकृत सूचनेद्वारे (Notification) कळवली जाईल."
विद्यार्थ्यांचे हाल आणि पुढील दिशा
परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी दूरवरच्या शहरांमध्ये प्रवासाचे नियोजन केले होते. काहींनी गाड्या पकडल्या होत्या, तर काहींनी राहण्याची सोय केली होती. मात्र, ऐनवेळी आलेल्या या बातमीमुळे त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहे की त्यांनी सोशल मीडियावरील कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. टीईटी परीक्षेबाबतची सर्व अद्ययावत माहिती आणि नवीन वेळापत्रक केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरच प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलच्या संपर्कात राहावे.