मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी कायद्याचे जनक होते. जे नियम हिंदूंना लागू होतात, तेच इतर धर्मांनाही लागू झाले पाहिजेत आणि हा समान नागरी कायदा राज्यात नक्की लागू होईल," असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी व्यक्त केला आहे. सकल हिंदू समाज, शाहुवाडी-कोल्हापूर यांच्या वतीने श्री क्षेत्र विशाळगड येथे आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवभक्तांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणांचा मुद्दा लावून धरत, गड लवकरच अतिक्रमण मुक्त केला जाईल, असे आश्वस्त केले.
विशाळगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा वैदिक मंत्रोच्चारात विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी म्हणाले, "सेक्युलररिझमच्या नावाखाली जे जिहादी वळवळ करत आहेत, त्यांना वाटते शिवाजी महाराज फक्त त्यांनाच कळतात. शिवाजी महाराज सेक्युलर होते, असे म्हणणाऱ्यांनी आज हा सोहळा पाहावा," असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, "शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आज विशाळगडावर एकही मुस्लिम का आला नाही? मूठभर भगवाधारींसाठी एवढा पोलीस बंदोबस्त का लावावा लागतो? हाच आमच्या आणि तुमच्या रक्तातील फरक आहे. आमचा बाप केवळ छत्रपती शिवाजी महाराज आहेत," असे ते म्हणाले.
विशाळगडावरील अतिक्रमणांबाबत बोलताना राणे म्हणाले, "मी गड चढत असतानाच या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांची यादी तयार करत होतो. सोमवारपासून यावर काय कारवाई होते ते सर्वांना दिसेल. मी काही 'व्हाइट कॉलर' मंत्री नाही; कार्यक्रम कसा करायचा, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे," असा इशारा त्यांनी संबंधितांना दिला. विशाळगडाला अपेक्षित असलेली मुक्ती आमचे हिंदुत्ववादी सरकारच देईल. आम्ही कोणतीही तारीख सांगणार नाही, थेट योग्य वेळी बुलडोझर चालवून कारवाई करू. विशाळगडावर जो कोणी येईल, तो वाघजाई देवीच्या दर्शनासाठीच येईल", असे सांगत त्यांनी वाघजाई देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारत असल्याचे जाहीर केले.
......
शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शाहुवाडी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. राज्याभिषेक होत असताना प्रत्येक शिवभक्ताच्या मनात अभिमान, श्रद्धा आणि स्वराज्याप्रती निष्ठेची भावना दाटून आली होती. "जिथे जिथे भगवा फडकतो, तिथे तिथे शिवरायांचे विचार जिवंत राहतात," असे सांगत मंत्री राणे यांनी कट्टर हिंदू म्हणून निवडणूक लढवून हिंदू मतदारांच्या बळावरच आपण निवडून आल्याचे स्पष्ट केले.