Wednesday, June 24, 2026

Navnath Ban : मुंबईत पाणी तुंबल्यावर घरात बसून आरोप करणे हा आमचा धंदा नाही

Navnath Ban : मुंबईत पाणी तुंबल्यावर घरात बसून आरोप करणे हा आमचा धंदा नाही

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर प्रहार

मुंबई : मुंबईत अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आवश्यक खबरदारी घेत आहे. मात्र जनाब संजय राऊतांना सांगायचेय की शहरात पाणी साचल्यावर घरात बसणारे आम्ही नाहीत. मुंबईच्या महापौर रितूताई तावडे (Ritu Tawade) सकाळपासून मुंबईच्या रस्त्यावर उतरून आढावा घेत आहेत. महापालिका यंत्रणाही कार्यरत आहे. निश्चितपणे काही भागांमध्ये नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने पाणी साचले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तुमच्यासारखे फक्त पत्रकार परिषद घ्यायची आणि घरात बसून आरोप करायचे हा आमचा धंदा नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केलेल्या शोकप्रस्ताव वाचनात प्रिंट मिस्टेक आणि लहान फॉन्टमुळे काही चुका झाल्या. त्यांच्या भावना महत्त्वाच्या होत्या आणि त्या त्यांनी सभागृहापुढे मांडल्या. विधानभवनासमोर दिलगिरी व्यक्त केली. परंतु संजय राऊत (Sanjay Raut), तुम्ही रोज महाराष्ट्राच्या भावना दुखावता त्याचे काय? राऊत म्हणतात, राहुल नार्वेकरांना रोमन लिपी वाचता येत नाही. मराठी भाषेत रोमन लिपी आहे की देवनागरी लिपी हे तुम्हाला कळत नाही. मराठी भाषेचा गौरव कसा करायचा हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. रोज पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अश्लील भाषा वापरता. लोकांना शिवीगाळ करता. कमरेखालचे शब्द वापरून खासदारांना शिवीगाळ करता. जनतेचा अपमान करता. एवढेच नाही तर समोर असलेल्या बूमवर थुंकण्याचे पापही तुम्ही केलेले आहे. त्यामुळे मराठी भाषेचे फार ज्ञान असल्याचा आव आणू नका. मराठी भाषेचा वापर करून इतरांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी तुम्हाला सुचते आणि त्यामुळे संजय राऊत आधी तुम्ही महाराष्ट्राची माफी मागावी, अशा शब्दात नवनाथ बन (Navnath Ban) यांनी खरडपट्टी काढली.
तुम्ही संजय राऊत आहात का संजय दाऊद आहात, असा सवाल करून नवनाथ बन पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने दाऊदने मुंबईची वाट लावण्याचा काम केले त्याप्रमाणे संजय राऊतही मुंबईची वाट लावताहेत. ज्या पद्धतीने दाऊदने पाकिस्तानात पळून जात तेथे आश्रय घेतला. तसे संजय राऊतही पाकिस्तानचा आश्रय घेतात. रोज पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेता. मग तुम्ही संजय राऊत आहात का संजय दाऊद, हा प्रश्न आम्हालाही पडतोय.संजय राऊत, तुम्ही फुटीर खासदारांच्या गप्पा मारण्यापेक्षा आपल्या पक्षातले आमदार, नगरसेवक का फुटताहेत याची चिंता करा. खासदार तर तुम्हाला सोडून गेले. येत्या काळात तुमचे आमदारही तुम्हाला सांभाळता येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. रोज सकाळी दहा वाजता खोटे बोलायचे, लोकांना शिवीगाळ करायची एवढेच तुम्हाला काम आहे. आपण आपल्या पक्षाकडे लक्ष द्या. बाकी चिंता करण्यासाठी वेगवेगळे नेते आहेत, असे श्री. बन यांनी सुनावले.दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, असे विधान करण्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? एकनाथजी शिंदे यांची यांना बच्चू कडूंच्या अशा विधानांना परवानगी असेल तर आम्हीही दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करायला तयार आहोत. फक्त बच्चू कडूंनी एकदा एकनाथजी शिंदे यांना विचारावे, असेही श्री. बन म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा