Wednesday, June 24, 2026

Rahul Narwekar : मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारणाबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण

Rahul Narwekar : मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारणाबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण

- प्रिंटमध्ये तांत्रिक चुका; मने दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेतून शोकप्रस्ताव मांडताना झालेल्या अशुद्ध उच्चारणांमुळे समाजमाध्यमांवर प्रचंड ट्रोलींग सुरू झाल्याने, या संपूर्ण प्रकरणावर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले आहे. "शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील (प्रिंट) तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचे मन दुखावले गेले असेल, तर मी त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो," असे अध्यक्ष म्हणाले.

या प्रकाराबाबत सविस्तर खुलासा करताना अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, "अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे आपण शोकप्रस्ताव घेत असतो आणि ते केवळ अध्यक्षांनीच वाचून दाखवायचे, असा निर्णय झाला होता. त्या दिवशी पटलावर एकूण १२ शोकप्रस्ताव होते, ज्यांचे वाचन मी सभागृहात केले. हे १२ शोकप्रस्ताव ज्या कागदावर प्रिंट होऊन आले होते, त्याचा फॉन्ट अत्यंत बारीक आणि अस्पष्ट होता. त्या प्रिंटमध्ये काही तांत्रिक चुका होत्या, ज्या सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आल्या नाहीत. परिणामी, समोर जसे आले होते तसे वाचन केल्यामुळे ही अनपेक्षित चूक घडली. गेली साडेचार वर्षे मी या सर्वोच्च सभागृहात अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. या प्रदीर्घ कार्यकाळात मी अनेक भाषणे आणि शोकप्रस्ताव मराठीतच मांडले आहेत. तसेच सभागृहाची संपूर्ण नियमावली आणि दैनंदिन कार्यपद्धती मराठी भाषेतूनच हाताळली आहे. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे, तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे." (Rahul Narwekar)

आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्वप्नातही करू शकत नाही; त्यामुळे या राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष तर मुळीच असे वक्तव्य करणार नाही. जे काही घडले ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडले आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये ही विनंती. तरीही यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. (Rahul Narwekar)

दोषींवर कारवाई करा - अजय चौधरी

अध्यक्षांच्या या खुलाशानंतर उबाठा गटाचे शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. "अध्यक्ष महोदय, तुमच्या भावना आणि अडचण आम्हाला पूर्णपणे समजली आहे. परंतु, राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या विधानसभा अध्यक्षांची प्रतिमा मलिन होईल, अशी सदोष आणि चुकीची प्रिंट देणारी जी काही यंत्रणा किंवा व्यक्ती असेल, तिचा शोध घेऊन तिच्यावर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे," अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >