Monday, June 22, 2026

उद्धव ठाकरेंनी आधीच खबरदारी घ्यायला हवी होती : आमदार निलेश राणे

उद्धव ठाकरेंनी आधीच खबरदारी घ्यायला हवी होती : आमदार निलेश राणे

मुंबई : ऑपरेशन टायगर अंतर्गत ६ खासदारांनी बंडखोरी करीत, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खबदरारी म्हणून उद्धव ठाकरेंनी सोमवारी सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यावर आमदार निलेश राणे यांनी टीका केली असून, "उद्धव ठाकरे यांनी ही खबरदारी आधीच घ्यायला हवी होती. आधी त्यांनी पक्षावर लक्ष दिले नाही. पायाखालची जमीन निसटून गेल्यानंतर आता कसली खबरदारी घेताहेत", असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. उबाठा गटातील बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता आ. राणे म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रत्येकाला मानसन्मान मिळतो. त्यांच्या आधीच्या पक्षात (उबाठा) मानसन्मान नव्हता, कोणी काही ऐकून घेत नव्हते, नेते भेटत नव्हते. त्यामुळे चीड निर्माण होणारच ना. इकडे एकनाथ शिंदे २४ तास उपलब्ध असतात, सर्वांना भेटतात, सगळ्यांना न्याय देतात. माझ्यासारखा १० वर्षे प्रक्रियेच्या बाहेर असलेला माणूस आज आमदार झाला, तो शिंदे साहेबांमुळेच", असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचे नेतृत्व स्वीकारण्यास सज्ज झालेले खासदार

  1. ओमराजे निंबाळकर, धाराशिव
  2. संजय जाधव, परभणी
  3. संजय दीना पाटील, ईशान्य मुंबई
  4. संजय देशमुख, यवतमाळ - वाशिम
  5. नागेश आष्टीकर - हिंगोली
  6. भाऊसाहेब वाकचौरे - शिर्डी

उबाठाची राजकीय ताकद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिउबाठा किंवा उबाठा या पक्षाची राजकीय ताकद हळू हळू कमी होत असल्याचे चित्र आहे. उबाठाचे लोकसभेत नऊ खासदार होते, त्यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. आता हा गट सभागृहात स्वतंत्र बसेल. लोकसभाध्यक्षांच्या निर्णयामुळे लोकसभेत उबाठा अतिशय कमकुवत झाल्याचे चित्र आहे.

उबाठाच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या : १

  1. संजय राऊत

उबाठाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या : ३

  1. अरविंद सावंत
  2. अनिल देसाई
  3. राजाभाऊ वाजे
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >