Amit Shah : शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच

मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 'शिवसेना शिंदे गट' असे म्हटले जायचे. मात्र, आता राज्यात कोणताही गट शिल्लक राहिलेला नाही. आता फक्त आणि फक्त एकच शिवसेना राहिली आहे आणि ती पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्याच बरोबर आहे," असे अत्यंत सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्याच्या भूमिपूजनानिमित्त कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सभेत ते बोलत होते. उबाठा गटाच्या ६ खासदारांच्या बंडानंतर राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी थेट नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. "ज्या काँग्रेस पक्षाच्या मांडीवर उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत, तो पक्ष घुसखोरांचा 'व्होट बँक' म्हणून वापर करून आपले राजकीय अस्तित्व टिकवू पाहतोय. पण मी त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की, हा भारत देश म्हणजे काही 'धर्मशाळा' नाही; इथे याच देशात जन्मलेले लोकच राहतील. आम्ही देशभरातील प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढू," असा इशारा त्यांनी या वेळी दिला.



या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह महायुतीचे अनेक बडे नेते उपस्थित होते. अमित शहा म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जेव्हा कधी स्वतंत्र भारताचा सुवर्ण इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ही १२ वर्षे भारताचा अजोड विकास, संस्कृतीचे पुनरुज्जीवन, सुरक्षित भारताची निर्मिती आणि जागतिक स्तरावर देशाचा वाढलेला सन्मान या अभूतपूर्व कामगिरीसाठी ओळखली जातील. या १२ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीमुळे सोमनाथ ते गंगासागर आणि संपूर्ण देशभर भाजप व एनडीएचा सत्ताविस्तार करण्यात आम्हाला मोठे यश आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या जनतेनेही भाजपला भरभरून आशीर्वाद दिला असून, आता बंगालच्या सीमांवरील घुसखोरीच थांबणार नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील बेकायदेशीर घुसखोरांना हुसकावून लावले जाईल", असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, अमित शहा यांचे भाषण सुरू असतानाच 'महाराष्ट्र एकीकरण समिती'च्या काही कार्यकर्त्यांनी अचानक सभागृहात घोषणाबाजी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत सर्व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले.



अंबाबाई मंदिराचा विकास हे देशाचे स्वप्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या सभेआधी करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याच्या तब्बल १ हजार ४४५.९७ कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अंबाबाई हे संपूर्ण देशातील जनतेचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा भव्य आणि दिव्य विकास व्हावा, अशी कोट्यवधी भाविकांची इच्छा होती. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही स्थानिक पातळीवर अपेक्षित विकास न झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत या भव्य प्रकल्पासाठी तात्काळ निधी मंजूर केला आणि आज त्यांच्याच हस्ते या पवित्र कामाचा शुभारंभ होत आहे, ही महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे."



'अमित शहा कोल्हापूरचे जावई, सेवा करण्यात कमतरता ठेवणार नाही'

फडणवीस म्हणाले, "अमित शहा यांचे कोल्हापूरशी एक भावनिक नाते आहे. महाराष्ट्रात सध्या अधिक मास म्हणजेच 'धोंड्याचा महिना' साजरा करण्याची परंपरा सुरू आहे, ज्यामध्ये जावयाची विशेष सेवा केली जाते. अमित शहा यांचे आगमन नियोजित वेळेपेक्षा चार दिवस उशिरा झाले असले, तरी कोल्हापूरचे जावई म्हणून तुमची सेवा करण्यात आणि पाहुणचारात आम्ही कोणतीही कमतरता ठेवणार नाही. तुमचे आशीर्वाद घेऊन आम्हाला हे विकासाचे काम करण्याची मोठी संधी मिळाली असून, ते आम्ही उत्तम प्रकारे पूर्ण करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर

Pavanraje Nimbalkar Murder Case : पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष

पवनराजे हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाचे

Omraje Nimbalkar : शिवसेनेत जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही!

पवनराजे हत्याप्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांची सावध प्रतिक्रिया; खासदारांच्या बंडाबाबतचा

BEST Strike : बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही कायम! प्रशासनाशी चर्चा फिस्कटली; मुंबईकरांचा प्रवास पुन्हा खोळंबणार

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी बेस्ट बससेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Wall Collapses : धक्कादायक! धोकादायक इमारतीच्या पाडकामादरम्यान भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई : भायखळा पश्चिम येथील दगडी चाळ परिसरात शुक्रवारी रात्री धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीच्या

करनिर्धारण व संकलन विभागासाठी ५०० संगणक खरेदीला मंजुरी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकरता तब्बल ५०० संगणक खरेदी केले जात असून एका संगणकासाठी १