रांची : झारखंडमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत एक मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. सत्ताधारी महाआघाडीकडे (झामुमो आणि काँग्रेस) पुरेसे संख्याबळ असतानाही, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची रणनीतिक तटबंदी भेदण्यात विरोधी पक्षांना यश आले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि भाजपच्या पाठबळाच्या जोरावर अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांनी जादुई आकडा गाठत काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा यांचा पराभव केला.
मध्य प्रदेश आणि बिहारनंतर आता झारखंडमधील या निकालाने एनडीएच्या राजकीय चक्रव्यूहाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली असून सत्ताधारी गोटात कमालीची शांतता पसरली आहे. या निवडणुकीत विधानसभेच्या सर्वच्या सर्व ८१ आमदारांनी शत-प्रतिशत मतदान केले होते. कागदावर महाआघाडीकडे स्पष्ट बहुमत दिसत असले, तरी परिमल नथवाणी यांच्या वैयक्तिक प्रभावामुळे सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी पक्षाची लाईन झुगारून नथवाणी यांच्या बाजूने 'क्रॉस व्होटिंग' (पक्षांतर मतदान) केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप आणि आजसू सह सर्व मित्रपक्षांनी पहिल्या दिवसापासून नथवाणी यांच्यासाठी कंबर कसली होती. कोणत्याही मोठ्या पक्षाच्या चिन्हाशिवाय नथवाणी यांनी दोन्ही आघाड्यांच्या मतांमध्ये यशस्वी सेंध लावली.
"झारखंड ही माझी कर्मभूमी"
या ऐतिहासिक विजयानंतर परिमल नथवाणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट शेअर करत आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. नथवाणी यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील (राज्यसभा) ही चौथी टर्म असणार आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, राज्यसभेचा सदस्य म्हणून चौथ्यांदा सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. हा क्षण माझ्यासाठी कमालीचा भावूक आहे, कारण झारखंडमधून माझी ही तिसरी टर्म असेल.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे मानले आभार
परिमल नथवाणी यांनी या कठीण निवडणुकीत मिळालेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.