मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उर्वरित अकरा जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ३१ उमेदवार रिंगणात असून ७०४३ मतदार त्यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय घेणार आहेत. मतदान प्रक्रिया सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
या निवडणुकीसाठी एकूण सतरा जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात उर्वरित अकरा जागांवर थेट लढत रंगणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड, सोलापूर, परभणी-हिंगोली, नांदेड, सांगली-सातारा, अमरावती आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.बहुतांश ठिकाणी त्रिकोणी लढतीचे चित्र दिसत असून जळगावमध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. सोलापूर, नागपूर आणि धाराशिव-लातूर-बीड येथे थेट लढती अपेक्षित आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून, त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या आदेशाला अवघ्या एका दिवसात स्थगिती देण्यात ...
महत्त्वाच्या लढती ठळकपणे
नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि शरद पवार गटाचे गोरख बोडके यांच्यात चुरशीची लढत होत आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट, उद्धव ठाकरे गटाचे गणेश लोखंडे आणि एमआयएम पुरस्कृत इशाक खान संदुखान यांच्यात त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळत आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत बंडखोरी आणि क्रॉस व्होटिंगची भीती वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या मतदारांवर पकड मजबूत ठेवण्यासाठी रणनीती आखली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मतदान करणार असल्याने, ऐनवेळी होणाऱ्या मतफुटीवरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.