२० जूननंतर माध्यमांशी सविस्तर संवाद साधणार
मुंबई : उबाठा गटाला खिंडार पाडणाऱ्या 'ऑपरेशन टायगर'च्या केंद्रस्थानी असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "मी दिल्लीला गेलो नसून सध्या पुण्यातच आहे," असा दावा करत त्यांनी सर्व चर्चांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे. तसेच, येत्या २० जूननंतर माध्यमांसमोर येऊन आपली अंतिम भूमिका सविस्तर मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदानाच्या तोंडावर नांदेडमध्ये नवा ट्विस्ट; काँग्रेसच्या मतांच्या विभाजनामुळे भाजपचे पारडे जड मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी ...
ओमराजे निंबाळकर हे उबाठाचे अत्यंत निष्ठावंत शिलेदार मानले जात होते. त्यामुळे 'ऑपरेशन टायगर'मध्ये त्यांचे नाव समोर येताच राज्यभरातून त्यांच्यावर तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. सोशल मीडियावर ओमराजे यांना प्रचंड ट्रोल केले जात असून, त्यांचे 'मातोश्री'शी एकनिष्ठ राहण्याचे दावे करणारे जुने व्हिडीओ आणि भाषणांच्या क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी स्वतः आपण दिल्लीत नसून पुण्यातच असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, २० जूनच्या मुहूर्तावर ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.दरम्यान, दिल्लीत ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे वृत्त येत असले, तरी या पत्राबाबत अद्यापही मोठा संभ्रम असल्याचे चित्र आहे. बंडखोर खासदारांचे स्वाक्षऱ्यांचे पत्र किंवा त्यांचा एकत्र फोटो अद्याप समोर आलेला नाही. याच तांत्रिक मुद्द्याचा आधार घेत उबाठा गटाने दावा केला आहे की, त्या ६ पैकी २ खासदारांनी बंडखोरांच्या पत्रावर स्वाक्षऱ्याच केलेल्या नाहीत. ते २ खासदार अजूनही अधिकृतपणे उबाठासोबतच आहेत. लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेले पत्र तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचा दावा उबाठा नेत्यांनी केला आहे.