Tuesday, June 16, 2026

Navnath Ban : उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही

Navnath Ban : उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही

 मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या शिवबंधनात वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही. आणाभाका देऊन वा शिवबंधन बांधून आमदार, खासदार टिकत नाहीत तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे बंधन लागते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्त्यांबद्दल ना प्रेम उरले, ना माणुसकी उरली, ना आपुलकी. त्यामुळे उबाठा गटाचे आमदार, खासदार सातत्याने पक्ष सोडून प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनात अडकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शपथा, शिवबंधनाला काहीही अर्थ नाही हे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात, असे सांगणे हा या दशकातला सर्वात मोठा विनोद आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या आमदार, खासदारांना मातोश्रीच्या दरवाजातून परत पाठवतात. मुळात संजय राऊतांनाही अनेकदा मातोश्रीत प्रवेश मिळत नाही हे वास्तव आहे. हा विनोद कॉमेडी सर्कसमध्ये सांगितला तर प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होईल, असे म्हणत  बन पुढे म्हणाले की ज्यांना प्रत्येक गोष्ट पैशांत मोजायची, भ्रष्टाचार करायची सवय आहे. असेच लोक खरेदीविक्रीची भाषा करणार. मुळात खरेदीविक्री करण्याचा अनुभव संजय राऊत यांना जास्त असेल. कारण पत्राचाळीत मराठी माणसांना देशोधडीला लावून खरेदीविक्री कोणी केली याचे उत्तर एकदा संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे.

संजय राऊत तुमच्या हातात ईडी, सीबीआय आणि न्यायालय दिले तरी तुमच्यासोबत एकही माणूस टिकणार नाही. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची सीबीआयकडून बारा – बारा तास चौकशी करण्यात आली होती. अमित शाह यांना तडीपार करण्यापर्यंत काँग्रेस सरकारची मजल गेली होती. परंतु ना अमित शाह यांनी भाजपा सोडली, ना नरेंद्र मोदीजींनी. आमचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि देवेंद्रजी फडणवीस यांना अनेक खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही अनेक आमदार, नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रयत्न केले. पण तुम्ही साधा एकही नगरसेवकही फोडू शकला नाहीत. ईडी - सीबीआयचा गैरवापर करून माणसे तोडता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांना भेटावे लागते. बोलावे लागते, त्यांना संधी द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या वाटेवर आला ते बघा, असेही श्री. बन यांनी नमूद केले .

विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने तुमच्या थोबाडीत मतरूपी जोडे मारले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या कानशिलात जोडे मारलेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तर भोपळा देऊन तुमच्या पक्षाला, तुमच्या पक्षप्रमुखाला आणि संजय राऊत तुम्हालाही लोकांनी मारले ते व्रण अजूनही पुसले गेलेले नाहीत. त्यामुळे जनतेचा असा अपमान करत असाल तर जनता तुम्हाला आणखी जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही, असे बन यांनी सुनावले.

अभिजीत दिपके यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या आंदोलनाला विरोध असेल तर आंदोलनाच्या मार्गाने किंवा लोकशाही पद्धतीने त्याला प्रतिकार करता येतो. परंतु अशा पद्धतीने कोणाला मारहाण करण्याचे समर्थन भाजपा कधीही करत नाही, असेही बन यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >