Friday, June 12, 2026

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींसोबत घडलेल्या 'लव्ह जिहाद' प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि संशयास्पद फंडिंगशी काही संबंध असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच कारणामुळे सखोल चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'विशेष तपास पथक' (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली आहे.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी डहाणू प्रकरणी एसआयटी स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळाल्याचे पाहून आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले. डहाणूतील या पीडित मुलींना 'स्टुडंट व्हिसा'च्या नावाखाली लंडनला नेण्याचे मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले गेल्याचा संशय आमदार वाघ यांनी व्यक्त केला होता. "महाराष्ट्राच्या लेकींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि नराधमांसह त्यांच्या आंतरराष्ट्रीय 'मास्टरमाइंड'ला ठेचण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली.डहाणू पोलीस ठाण्यात १ जून रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, एका विशिष्ट समुदायाच्या तरुणाने एका तरुणीला जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले होते. या व्हिडिओंच्या आधारे संबंधित तरुणीला आणि तिच्या बहिणीला ब्लॅकमेल करून अत्याचार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप आहे. हिंदू मुलींना फूस लावून त्यांच्यावर नियोजनबद्ध पद्धतीने अत्याचार करण्याचे हे सत्र सुरू असल्याचे समोर आल्यानंतर डहाणूमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

फूस लावून केवळ डहाणूच नव्हे, तर पालघर जिल्ह्यातील अनेक मुलींना थेट लंडनला नेण्यात आल्याचा संशय आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. हा सर्व प्रकार आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा भाग असल्याचा संशय आल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि त्याचे साथीदार सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी डहाणू पोलिसांची दोन पथके परराज्यात रवाना करण्यात आली आहेत. आता 'एसआयटी'ची स्थापना झाल्यामुळे या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय नेटवर्क, संशयास्पद आर्थिक व्यवहार (फंडिंग) आणि धर्मांतराचा अँगल या सर्व बाजूंचा कसून तपास केला जाणार आहे.

Comments
Add Comment