Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना झालेल्या हँड ग्रेनेडच्या भीषण स्फोटात भारतमातेच्या दोन वीर जवानांना वीरमरण आले आहे. देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असून, यात नवी मुंबईतील ऐरोलीचे विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील शहापूर (ता. कराड) येथील अर्जुन राजेंद्र जाधव यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन्ही हुतात्मा जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, "देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या दोन्ही वीरांच्या कुटुंबीयांच्या दुःखात राज्य सरकार पाठीशी उभे आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Uri Blast)



लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमधील 'कमलकोट' लष्करी कॅम्पमध्ये नियंत्रण रेषेजवळ (Uri Blast) नियमित गस्त आणि शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण सुरू असताना एका हँड ग्रेनेडचा (हातबॉम्ब) अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही जवानांना तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या '९२ बेस हॉस्पिटल'मध्ये हलवण्यात आले होते, मात्र डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, लष्कराकडून या स्फोटाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Uri Blast)


या दुर्घटनेत शहीद झालेले कराड तालुक्यातील शहापूरचे जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. लष्कराच्या 'बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप'चे जवान असलेल्या अर्जुन यांची सध्या '८ राष्ट्रीय रायफल्स' युनिटमध्ये नियुक्ती होती. त्यांच्या घरात देशसेवेची मोठी परंपरा असून, त्यांचे धाकटे भाऊ ऋषी जाधव हे देखील भारतीय नौदलात कार्यरत आहेत. मुलाचा पहिला वाढदिवस आणि या कौटुंबिक सोहळ्यासाठी त्यांनी १५ जूनपासून सुटीही मंजूर करून घेतली होती. मात्र, सुटीवर येण्यापूर्वीच नियतीने हा घाला घातल्यामुळे संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक वर्षाचा मुलगा, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. (Uri Blast)







या स्फोटात वीरमरण आलेले दुसरे जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंदवले येथील रहिवासी असून, ते गेल्या काही काळापासून नवी मुंबईतील ऐरोली येथे वास्तव्यास होते. ऐरोलीत राहत असताना त्यांनी परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध जपले होते, त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद विक्रम चव्हाण यांचे पार्थिव गुरुवारी विमानाने मुंबईत आणण्यात आले असून ते पुण्याच्या खडकी लष्करी छावणीत ठेवण्यात आले आहे. शहीद अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण या दोन्ही शहिदांचे पार्थिव शुक्रवारी (१२ जून) सकाळी त्यांच्या मूळ गावी आणले जाणार असून, तेथे शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. (Uri Blast)

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील

Gadchiroli Crime : संतापजनक घटना! चामोर्शीत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम

Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, राज्यभर तीव्र निषेध

Chhatrapati Sambhajinagar : बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व

Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद