Manmad : मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व अपुऱ्या उपचारांमुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रमाबाई नगर येथील रहिवासी आशा संजय संसारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, ६ जून रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजता मनमाड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असताना शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या घराची भिंत कोसळून त्यांच्या घरावर पडली. या दुर्घटनेत आशा संसारे आणि त्यांचे पती संजय संसारे हे दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
Nashik : कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडले असताना आता राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. कांदा दर घसरणीमागील कारणांचा सखोल ...
जखमी संजय संसारे यांना तातडीने मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीराज शिंदे यांनी रुग्णाची आवश्यक तपासणी न करता केवळ डोक्यावरील जखमेवर पट्टी बांधून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, रुग्णाला पुढील उपचारासाठी हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधण्यात आला असता रुग्णवाहिका उपलब्ध असूनही ती वेळेत पोहोचली नाही. काही खासगी रुग्णवाहिकांनी देखील रुग्ण नेण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकारात गंभीर जखमी रुग्णाला वेळेत योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत डॉ. योगीराज शिंदे तसेच संबंधित रुग्णालय कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशा संसारे यांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.