Nashik : शाळेचा पहिला दिवस म्हटलं की शाळेतून मिळणारी नवी कोरी पुस्तके समोर येतात. पण नाशिकच्या शाळांना यंदा पुस्तके मिळण्याचे गणित जरा अवघड दिसतंय. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवी कोरी पाठ्यपुस्तके देण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन यंदा कोलमडण्याची शक्यता आहे.
त्याचं कारण म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, जिल्ह्यासाठी असलेल्या पुस्तकांपैकी तब्बल ८ लाख ६१ हजार पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. अभ्यासक्रम सुधारित असल्यामुळे या पुस्तकांच्या छपाई आणि पुरवठ्याला उशीर झाला असून, शाळा सुरू होईपर्यंत हा पुरवठा पूर्ण होईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. आवश्यक शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.
८ लाख ६१ हजार पुस्तकांची प्रतीक्षा कायम
जिल्ह्यात या योजनेचे लाभार्थी असणारे ४ लाख ६६ हजार ४६३ विद्यार्थी आहेत. समग्र शिक्षा विभागाने चालू शैक्षणिक वर्षासाठी बालभारतीकडे एकूण २६ लाख ३८ हजार ८७८ पुस्तकांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी १७ लाख ७७ हजार ८७९ पुस्तके जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, त्यांचे तालुकानिहाय वितरणही पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित ८ लाख ६१ हजार पुस्तक केव्हा येणार हा मोठा प्रश्न आहे.
पालकांमध्ये संभ्रम, विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता
काही इयत्तांची पुस्तके शाळांमध्ये आलेली आहेत, तर काही इयत्तांची पुस्तके अजून आलेलीच नाहीत. यामुळे एकाच शाळेतील काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आणि काहींना नाही, अशी स्थिती आहे. या गोंधळामुळे यंदा पुस्तके वेळेवर मिळणार की नाही? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दुसरीकडे, शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके पडणार की नाही, या विवंचनेत असलेल्या पालकांकडूनही आता शाळांकडे सातत्याने चौकशी केली जात आहे.
सर्व पुस्तकांचा पुरवठा पूर्ण होईल
सुधारित अभ्यासक्रमामुळे बालभारतीकडून पुस्तके येण्यास काहीसा उशीर झाला आहे. मात्र, सर्व पुस्तकांची मागणी आधीच नोंदवलेली असल्याने, शाळा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी सर्व पुस्तकांचा पुरवठा पूर्ण होईल.
साईलता सामलेटी शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि. प.