Tuesday, June 9, 2026

Parth Pawar : इद्रीस नायकवाडी यांच्या राजीनाम्यावर पार्थ पवार ठाम

Parth Pawar : इद्रीस नायकवाडी यांच्या राजीनाम्यावर पार्थ पवार ठाम

 देवगिरी बंगल्यावर खलबते; भविष्यात मोठ्या संधीचा वरिष्ठांकडून शब्द

मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीत नवे नेतृत्व तयार करून पक्षाची घडी पूर्ववत करण्याचा युवा नेते पार्थ पवार यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनात्मक पदांसह वैधानिक पदांवर स्वमर्जीतील चेहऱ्यांना स्थान देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. बालमित्र विक्रम काकडे यांना आमदारकीची संधी दिल्यानंतर, आता आणखी एका निकटवर्तीयाला आमदारकीच्या बोहल्यावर चढविण्यासाठी त्यांनी विद्यमान आमदार इद्रीस नायकवाडी यांच्याकडे राजीनामा मागितला आहे. मात्र, ते राजीनामा देण्यास तयार नसल्याने मंगळवारी त्यांना देवगिरी निवासस्थानी बोलावून वरिष्ठ नेत्यांसमोर राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आणि इद्रीस नायकवाडी उपस्थित होते. "तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, पक्ष भविष्यात तुम्हाला यापेक्षा मोठी संधी देईल," असा शब्द यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नायकवाडी यांना दिला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपण राजीनामा देणार नाही, या भूमिकेवर इद्रीस नायकवाडी ठाम राहिल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.इद्रीस नायकवाडी हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवारांनी विशेष आग्रहाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यपाल नियुक्त कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. मात्र, दादांच्या पश्चात आता पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडूनच त्यांना पदावरून दूर होण्यास सांगितले जात असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

नायकवाडींकडून राजीनाम्यास नकार

बैठकीत वरिष्ठांनी राजीनाम्याचा आग्रह धरला असता, नायकवाडी यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. या वादाच्या पार्श्वभूमीवर नायकवाडी यांच्याबाबतचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. सांगलीचे महापौर असतानाही त्यांच्यावर असाच राजीनाम्यासाठी दबाव आणण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी स्थानिक आघाडी करून ४८ नगरसेवक निवडून आणले होते. आता पुन्हा एकदा आमदारकीचा राजीनामा देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे पार्थ पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा