तेहरान : इराणआणि इस्रायलमधील लष्करी संघर्ष कमालीचा वाढला असून मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रविवारी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागल्यानंतर, इस्रायलनेही इराणच्या मुख्य भूमीवर प्रतिहल्ला केला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत, उपलब्ध मार्गांचा वापर करून तात्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच इतर भारतीयांना इराणचा प्रवास न करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी या परिस्थितीला अमेरिका थेट जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, इस्रायलने हल्ले सुरूच ठेवल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'बाब-अल-मंदेब' हा समुद्री मार्ग बंद केला जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे. हा जलमार्ग आशिया, युरोप आणि अरब देशांमधील व्यापाराचा मुख्य कणा असल्याने, इराणच्या या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.