५ दिवसांत पावणेदोनशे धाडी, १९२ जण गजाआड; राज्यभरातील धडक मोहिमांत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई : गुटखामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य सरकारने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. दि. १ जून ते ५ जून २०२६ या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात १९५ ठिकाणी धडक धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल १९२ आरोपींना मुसक्या आवळून गजाआड करण्यात आले आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचा टप्पा अखेर पूर्ण ...
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्याच्या विविध भागांत हे धाडसत्र राबवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे करण्यात आली. ५ जून रोजी परांडा येथील एका गोदामावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून दोन जणांना जागीच अटक केली आहे.गुटख्याच्या आंतरराज्यीय तस्करीला चाप लावण्यासाठी 'एफडीए'ने पोलिसांच्या मदतीने महामार्गांवर पाळत ठेवली होती. ४ जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यात ६० लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, तो वाहनासह जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागातील नांदेड येथे १७ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा, तर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे २३ लाख ५० हजार रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या मोशी येथे ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा माल जप्त करून चिखली पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.
न्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचेच वर्चस्व दिसले. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा ...
कोकणात सर्वाधिक धाडी
प्रशासनाने जाहीर केलेल्या विभागवार आकडेवारीनुसार, कोकण विभागात सर्वाधिक ७९ धाडी टाकून ७८ जणांना अटक करण्यात आली. मात्र, जप्त केलेल्या मालाच्या किमतीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात अवघ्या ९ धाडींमध्ये १ कोटी १५ लाख ६४ हजार ५३३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे विभागात ५२ धाडींत १५ लाखाहून अधिक, तर नाशिक विभागात ३५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. मुंबईत ३० धाडी टाकून ३० जणांना अटक करण्यात आली आहे.