Friday, June 5, 2026

Raigad Crime: दागिन्यांच्या लालसेमुळे वृद्धेचा खून; मृतदेह आंबेनळी घाटाच्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

Raigad Crime: दागिन्यांच्या लालसेमुळे वृद्धेचा खून; मृतदेह आंबेनळी घाटाच्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग तालुक्यातील 85 वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकण्यात आला. ही हत्या महिलेच्या जवळच्या नातेवाईकांनीच केली आहे, असं पोलीस तपसात उघड झाले आहे.

मृत महिलेचे नाव सुनंदा लक्ष्मण पाटील (वय 85) आहे. त्या अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील रहिवासी होत्या. 31 मेपासून त्या बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण म्हणून तपास सुरू करण्यात आला, मात्र पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) आणि त्याचा साथीदार रितेश नरेश लोहार या दोघांनाही अटक केली आहे. आरोपी अनदर्श हा मृत महिलेचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.

नेमकी हत्या का करण्यात आली ?

पोलिसांच्या माहितीनुसार, वृद्ध महिलेकडे असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर आरोपींची नजर होती. दागिने चोरण्याच्या उद्देशाने या दोघांनी ही हत्या केली . सर्वप्रथम त्यांनी सुनंदा पाटील यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने तिनविरा परिसरात नेऊन गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकला. वृद्ध महिला बेपत्ता असल्याची तक्रार आणि तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कट उलगडला.

पोलिसांचा तपास सुरू

मांडवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दागिन्यांसाठी आपल्याच नातेवाईकाचा जीव घेणाऱ्या या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर आता समोर आलेल्या या हत्याकांडाने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment