Wednesday, June 3, 2026

Nashik : कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील बंड शमले, नाशिकचा पेच कायम; उदय सामंत पोहोचताच बंडखोर 'नॉट रिचेबल'

Nashik : कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील बंड शमले, नाशिकचा पेच कायम; उदय सामंत पोहोचताच बंडखोर 'नॉट रिचेबल'

Vidhan Parishad Nivadnuk  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या ( Vidhan Parishad Nivadnuk ) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये उफाळून आलेली बंडखोरी रोखण्यात नेत्यांना काही अंशी यश आले असून, प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) बंड अखेर पूर्णपणे शमले आहे.

मात्र, नाशिकमधील (Nashik)  बंडखोरीचा पेच अद्यापही कायम असून, तेथील भाजपच्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. परंतु, सामंत नाशिकमध्ये पोहोचताच बंडखोर नेते अचानक 'नॉट रिचेबल' ('Not reachable') झाल्याने महायुतीच्या नेत्यांची कमालीची धावपळ उडाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीला काही तास शिल्लक असताना नाशिकचा तिढा कसा सुटणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा रंगलेल्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अखेर शिवसेनेचा विरोध मावळला आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असून, खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या उमेदवारीला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) आणि मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा तीव्र विरोध होता.

दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. अखेर, सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेट घेतल्यानंतर हा विरोध संपुष्टात आला. बुधवारी शिंदे यांचे हेलिकॉप्टर रायगडमध्ये उतरण्यापूर्वीच, जुईली दळवी यांच्या सूचकांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. जुईली यांची तब्येत ठीक नसल्याने त्या स्वतः येऊ शकल्या नाहीत, मात्र अर्ज मागे घेतल्याने आता अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्येही नाट्यमय घडामोडींनंतर बंडाची तलवार म्यान झाली आहे. 'भाजप शिवसेना पक्ष संपवू पाहत आहे' असा गंभीर आरोप करत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांनी भाजपविरोधात दंड थोपटले होते आणि त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज भरला होता. सत्तार यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना तातडीने मुंबईत पाचारण केले. मंगळवारी रात्री झालेल्या साडेतीन तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, 'महायुतीचा धर्म पाळायचा आहे, माघार घ्या' असे शिंदेंनी सुनावताच सत्तार यांनी नमते घेतले. पक्षाच्या आदेशानुसार समीर सत्तार आपला अपक्ष अर्ज मागे घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

नाशिकमध्ये काय वाद ?

कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील वाद मिटला असला, तरी नाशिकमध्ये महायुतीसमोरील आव्हान अधिक गडद झाले आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकला आहे. या गीते बंधूंची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री उदय सामंत स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र, सामंत नाशिकमध्ये दाखल होताच दोन्ही बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जूनपर्यंत असल्याने, या मुदतीपूर्वी गीते बंधूंचा शोध घेऊन त्यांचे बंड थंड करण्यात उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश येते का, की नाशिकमध्ये महायुतीला बंडखोरीचा मोठा फटका बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >