Tuesday, May 26, 2026

Deputy Chief Minister Eknath Shinde : कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही !

Deputy Chief Minister Eknath Shinde : कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही !

अमित शाहांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे संवेदनशील असून, केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीत निश्चितच सकारात्मक तोडगा निघेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.शिंदे म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कांदा खरेदी केंद्रे सुरू केली असून सध्या १५ रुपये ८० पैसे प्रति किलो या दराने कांदा खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. “कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारला पूर्णपणे माहीत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत अमित शाह यांच्याकडून यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,"असे शिंदे म्हणाले.विरोधकांच्या आंदोलनांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, “विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी आणि मीडियात झळकण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला जात आहे. ही शेतकऱ्यांच्या हिताची लढाई नसून निव्वळ स्टंटबाजी आहे.” यूपीए सरकारच्या काळाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, “काँग्रेसच्या सत्ताकाळातही कांद्याने जनतेला रडवले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेली नव्हती. आज मात्र केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.”कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा