Monday, May 25, 2026

Bal Bhavan : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Bal Bhavan : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई या नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चर्नी रोड येथे करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका महापौर रितू तावडे, माजी शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलतांना म्हणाले की , 75 वर्षानंतर बालभवन या इमारतीचे अतिशय सुंदर रीतीने नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. लहान बालकांसाठी सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मुलांना विविध कला, कौशल्य, खेळ शिकता येईल, नाविन्यपूर्ण समजून घेता येतील. येथे विविध पद्धतीचे वाद्य-संस्कृती असेल, त्यासंदर्भात प्रशिक्षण इथे घेता येईल. आपल्या मुलांकरता, पालकांसाठी एक अतिशय सुंदर अशा प्रकारची वास्तू तयार झाली आहे. मी स्वतः, मुंबईचे महापौर आणि मुंबईचे आयुक्त यांना विनंती करणार आहे की, त्यांनी आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जी मुले आहेत, त्यांना या ठिकाणी आणावे आणि त्यांनाही इथल्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. दरवर्षी १ लाख विद्यार्थ्यांसाठी येथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच बालभवनाची पाहणी करून शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे अभिनंदन केले.

नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

यावेळी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.“मुले ही राष्ट्राची संपत्ती असून, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे. नव्या वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील,” असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण मंत्री श्री भुसे म्हणाले की,“प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार, शास्त्रज्ञ आणि नेता दडलेला असतो. त्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ देण्याचे कार्य बालभवन करणार आहे,” 24 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते या संस्थेची कोनशीला बसविण्यात आली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी 1952 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांनीही या संस्थेला सदिच्छा भेट दिली होती.

बालभवनच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे 3.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच अत्याधुनिक कला दालनांच्या निर्मितीसाठी अतिरिक्त 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय उभारण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष, तर दुसऱ्या मजल्यावर मूर्तिकला व चित्रकला दालनासह विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वच्छतागृहांची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या वास्तूमध्ये 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेली तीन सुसज्ज सभागृहे असून, एकाच वेळी 500 विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. दरवर्षी जवळपास एक लाख विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार असल्याचेही मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

या केंद्रात कला, संगीत, नृत्य, अभिनय, चित्रकला, शिल्पकला, भरतनाट्यम्, कथक, लोककला यांसह विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मल्लखांब, योगासने, कराटे, बुद्धिबळ आणि स्केटिंगसारखे उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन आणि ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल,शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, संचालक एस सी इ आर टी डॉ. हेमंत वसेकर, बालभवन संस्थेच्या संचालिका निता पाटील, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >