नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या एकूण ₹४ कोटी ८० लाख किमतीच्या अमली पदार्थांचा विधीवत नाश करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. भद्रकाली पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्र. 3036/2010 अंतर्गत एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब), २९ अन्वये जप्त करण्यात आलेला गांजा मा. न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला.
या कारवाईत एकूण २,४०० किलो गांजा होता. दिनांक २२ मे २०२६ रोजी ही नष्ट प्रक्रिया महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, रांजणगाव, पुणे येथे काटेकोर सुरक्षा व पर्यावरणीय नियमांचे पालन करून पार पाडण्यात आली. जप्त अमली पदार्थांचा नाश उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीच्या देखरेखीखाली करण्यात आला.
यावेळी अपर पोलीस महासंचालक ज्योतिप्रिया सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक अनुज तारे, तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे, नाशिक शहर) किरणकुमार चव्हाण यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक रंजन बेंडाळे आणि अंमली पदार्थविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार, तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे नाशिक शहर पोलीस दलाची अंमली पदार्थांविरुद्धची कठोर व सातत्यपूर्ण भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि त्याचा गैरफायदा घेत होणारा 'दर्शनाचा काळा बाजार' रोखण्यासाठी ...
६४ वर्षीय वृद्धेला लुटले
तर दुसरीकडे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयातून पायदुखीचे औषध घेऊन बाहेर पडणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धेला दोन अनोळखी महिलांनी पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले आणि त्यांच्या अंगावरील तब्बल दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रग्णालयाच्या आवारात दोन अनोळखी महिलांनी लताबाई आबाजी लभडे (वय ६४) यांना पाणी पिण्यास दिले. पाणी पिताच लताबाईंना चक्कर आली आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. काही वेळाने लताबाईंची गुंगी उतरली. त्यांना दोन्ही महिला गायब असल्याचे दिसले. त्यांनी स्वतःची तपासणी केली असता, गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची पोत आणि कानातील ५ ग्रॅमची सोन्याची कर्णफुले असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच लताबाईंनी तातडीने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संशयित महिला परजिल्ह्यातील एखाद्या संघटित लुटारू टोळीच्या सदस्य असण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारची टोळी शहरात सक्रिय झाल्याा अंदाज वर्तविला जात आहे.