स्वतःचा मतदारसंघ सोडून बारामतीत जनता दरबार; अजितदादांची जागा घेण्यासाठी धडपड
मुंबई : पश्चिम महाराष्ट्राच्या पर्यायाने राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २०२९ च्या रणसंग्रामाची नांदी आत्तापासूनच सुरू झाली आहे. प्रदीर्घ काळ बारामतीवर एकहाती पकड असणारे दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवून हा बालेकिल्ला महायुतीकडेच राखला. मात्र, सुनेत्रा पवारांच्या या ताज्या विजयानंतरही, २०२९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी बारामतीत 'धडपड' सुरू केली आहे. आपला स्वतःचा अहिल्यानगर जिल्ह्यातील (कर्जत-जामखेड) मतदारसंघ बाजूला सारून रोहित पवारांनी बारामतीत दौरे वाढवत चक्क 'जनता दरबार' घेण्यास सुरुवात केल्यामुळे, त्यांना बारामतीचा नवा ‘दादा’ बनण्याची घाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
रोहित पवार यांनी शनिवारी बारामतीच्या शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात भव्य 'जनता दरबारा'चे आयोजन केले होते. या माध्यमातून त्यांनी बारामतीमधील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांचे नागरी व वैयक्तिक प्रश्न जाणून घेतले. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी झाल्या असल्या, तरी रोहित पवारांनी घेतलेला हा जनता दरबार महायुती आणि अजित पवार गटाच्या राजकीय अस्तित्वाला थेट आव्हान देणारा मानला जात आहे. प्रदीर्घ काळ 'अजितदादां'चीच एकछत्री राजवट पाहणाऱ्या बारामतीकरांसाठी हा नवा अनुभव होता. त्यामुळे बारामतीच्या राजकीय वारश्यावर हक्क सांगण्यासाठी रोहित पवारांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याची कुजबूज सर्वसामान्य बारामतीकरांमध्ये सुरू झाली आहे.
२०२९ च्या लढाईचे पूर्वसंकेत?
काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना मोठे संकेत दिले होते. भविष्यात बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये थेट राजकीय सामना रंगण्याची शक्यता त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी मारलेली बाजी आणि त्यातच आता रोहित पवारांनी बारामतीत आपली राजकीय सक्रियता कमालीची वाढवणे, हे सर्व २०२९ च्या मोठ्या लढाईचे पूर्वसंकेत मानले जात आहेत. त्यामुळे बारामतीमधून स्वतः नशीब आजमावण्यासाठी रोहित पवार आत्तापासूनच जमिनीवर चाचपणी करत आहेत का? असा सवाल राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आ