मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम; बोगस मतदान रोखणे हाच मोहिमेचा हेतू
मुंबई : मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या 'एसआयआर' प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कायदेशीर आणि पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी दिली. मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक बनवणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चोक्कलिंगम म्हणाले, अनेकदा निवडणूक काळात मतदार यादीतून नावे गायब असणे, एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असणे किंवा मृत व्यक्तींच्या नावावर मतदान होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येतात. या सर्व त्रुटी कायमच्या दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जात असून, दुबार नावे आणि मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.मात्र, या प्रक्रियेत काही पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक किंवा तांत्रिक चुकीमुळे वगळली जात असल्याचा संशय काही पक्षांकडून केला जात आहे. त्याबाबत विचारले असता चोक्कलिंगम म्हणाले, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक मतदाराला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली जात असून, कोणावरही अन्याय होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे.
कोणत्याही दबावाशिवाय प्रक्रिया सुरू
निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 'एसआयआर' प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, प्रत्येक बदलाची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवली जात आहे. मतदारांनीही आपल्या नावातील चुका दुरुस्त करण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी किंवा नवीन नाव नोंदणीसाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ही प्रक्रिया कोणत्याही दबावाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पूर्ण करून एक अत्यंत शुद्ध आणि निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे चोक्कलिंगम म्हणाले.






