Bcci Action : आयपीएल २०२६ मध्ये काल (बुधवार २० मे २०२६) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात केकेआरने चार विकेट्सने विजय मिळवला. याच सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला बीसीसीआयने दंड ठोठावला. हार्दिक पांड्यासाठी हा हंगामा फारसा चांगला गेला नाही. त्याच्या नेतृत्वात मुंबईला फक्त १३ पैकी चार सामने जिंकता आले आहेत. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. मात्र हा सामना प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने जिंकायला हवा होता.
नेमकं प्रकरण काय ?
कोलकात्याच्या डावातील दहाव्या षटकात मुंबईच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे हार्दिक चांगलाच संतापला होता. त्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोव्हमन पॉवेल याने हवेत फटका मारला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर हा सोपा झेल होता, मात्र दीपक चहर आणि रॉबिन मिन्झ यांच्या गोंधळामुळे झेल सुटला. हा झेल प्रत्यक्षात चाहरचा होता, पण मिन्झ झेल घेईल असा समज झाल्याने त्याने प्रयत्नच केला नाही. यानंतर लगेचच मनीष पांडे याने सलग दोन चौकार ठोकले आणि त्यानंतर हार्दिकचा संयम सुटला. क्षेत्ररक्षणातील ढिलाई पाहून हार्दिकने रागाच्या भरात विकेटच्या बेल्स जोरात फेकू दिल्या. या प्रकरणाची दखल घेत बीसीसीआयने एक अधिकृत निवेदन जाहीर केले. त्यात बीसीसीआयने सांगितले की, हार्दिक पांड्याने आचारसंहितेतील कलम २.२ चे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याचे या सामन्याचे दहा टक्के मानधन दंड म्हणून कापून घेतले आहे. हार्दिकच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा करण्यात आला आहे.
या हंगामात हार्दिक पांड्याची कामगिरी
हार्दिक पांड्याला यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. हार्दिकच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत ९ पैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत . आता हार्दिकच्या व्यक्तिगत कामगिरी बद्दल बोलायचं तर त्याने ९ सामन्यात फलंदाजीत १७२ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत चार विकेट् घेतल्या आहेत.






