Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत कर्तव्य बजावताना अग्निशमन अधिकारी सागर शिंदे (वय ४३) आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (वय ५३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाचे कर्मचारी सुजित पाष्टे आणि समीर जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच बाधित व्यापारी, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाशी चर्चा केली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाला आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या कालावधीत मंडईतील अनेक गाळे, दुकाने आणि कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला.
या दुर्घटनेत प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निशमन अधिकारी सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.घटनास्थळी व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधताना अनेकांनी अत्यंत भावनिक स्वरूपात आपल्या व्यथा मांडल्या. “आमचा संसार उद्ध्वस्त झाला, आता आम्ही कुठे जायचं?” अशी हळहळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. अनेक गाळाधारकांचे अंदाजे ५ ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित व्यापारी, नागरिक आणि कुटुंबांना योग्य व कमाल नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा मुख्य आधार हरपला असून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी वारसा हक्कावर (अनुकंपा तत्त्वावर) तात्काळ शासकीय अथवा संबंधित सेवेत नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रशासनाकडे केली. संबंधित कुटुंबातील पात्र सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदावर समाविष्ट करून घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी या घटनेमागील संभाव्य निष्काळजीपणाकडेही गंभीरपणे लक्ष वेधले. गावदेवी भाजी मंडई ही मूळतः केवळ भाजी विक्रीसाठी उभारण्यात आली होती. मात्र, स्थावर मालमत्ता विभागाच्या ढिसाळ आणि संशयास्पद कारभारामुळे परिसरात अनधिकृत टपऱ्या आणि अतिरिक्त बांधकामे वाढल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.
“आजची दुर्घटना ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि भ्रष्ट कारभाराचा परिणाम आहे. योग्य वेळी कारवाई झाली असती, तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती. या निष्काळजीपणाची किंमत दोन निष्पाप कर्मचाऱ्यांना जीव गमावून चुकवावी लागली, हे अत्यंत वेदनादायी आहे,” असे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी स्पष्टपणे नमूद केले.या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, आग प्रतिबंधक यंत्रणांचा सखोल आढावा घ्यावा तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरातील व परिसरातील सर्व बाजारपेठांचे तात्काळ ‘फायर ऑडिट’ करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या ठिकाणी अग्निसुरक्षेतील त्रुटी आढळतील, तेथे तातडीने कठोर उपाययोजना करून अग्निशमन यंत्रणा सक्षम व सज्ज करण्यात यावी, असेही आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रशासनाला सुचवले.लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयातून आगग्रस्त व्यापारी व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वासही आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी यावेळी व्यक्त केला.