Thursday, May 21, 2026

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई : आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि भविष्यातील निवडणुकांचा वेध घेत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाची पाळेमुळे तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून राज्यभरात संघटनात्मक पुनर्रचना आणि बांधणी राबवली जात असून, २८८ मतदारसंघांपैकी तब्बल २०० विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या संपूर्ण मोहिमेची सूत्रे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

या मोहिमेअंतर्गत शिवसेनेने संपूर्ण राज्याचे संघटन पातळीवर चार प्रमुख विभागांमध्ये वर्गीकरण केले असून, प्रत्येक विभागाची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे विदर्भ आणि मराठवाडा या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा मोठ्या क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई महानगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या विस्ताराचा सुकाणू सोपवण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मंत्री दादा भुसे आणि गुलाबराव पाटील, तर कोकण पट्ट्याची धुरा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे देण्याचे निश्चित झाले आहे. हे सर्व प्रमुख नेते आपापल्या नियुक्त क्षेत्रांमध्ये जाऊन केवळ स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतील, तसेच पक्षाच्या शाखा अधिक बळकट करणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये थेट समन्वय निर्माण करण्यासाठी विशेष दौरे करणार आहेत.

प्रत्येक मतदारसंघात १० हजार कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारणार

शिवसेनेच्या या रणनीतीमागे प्रामुख्याने २०२९ मधील विधानसभा निवडणुकांचे गणित दडलेले आहे. महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांसोबत काम करत असताना, जागावाटपामध्ये किंवा राजकीय वाटाघाटींमध्ये शिवसेनेची बाजू वरचढ राहावी, यासाठी आत्तापासूनच जमिनीवर मोठी ताकद निर्माण करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत आहे. म्हणूनच पक्षाने ठरवलेल्या २०० मतदारसंघांमध्ये विशेष संपर्क अभियान चालवले जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान १० हजार ते १५ हजार सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे कार्यकर्ते शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा