बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता स्वतः विराटने यावर भाष्य करताना म्हंटल की भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना ९ वर्षांत कुणी नाही विचारले की तू कसा आहेस? आरसीबी इनोवेशन लॅबमध्ये बोलताना कोहलीने त्याच्या कर्णधारपदाच्या दिवसातल्या आठवणी आणि आपल्या मानसिक स्थितीबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाला विराट ?
मी पूर्णपणे थकलो होतो. संघाची फलंदाजी आणि कर्णधारपदाचा ताण दोन्ही माझ्यावर होते. भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर ठेवण्याच्या ध्यासामुळे मी स्वतःकडे लक्षच दिले नाही. तो पुढे म्हणाला की कर्णधारपद सोडेपर्यंत तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला होता.
कर्णधारपद म्हणजे फक्त निर्णय नव्हे
कोहलीने सांगितले की कर्णधारपद म्हणजे फक्त मैदानावरील निर्णय घेणे नसते. खेळाडूंना समजून घेणे, त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आणि संघाची मानसिकता सांभाळणे हीही मोठी जबाबदारी असते. तुम्ही सतत अशा मानसिक स्थितीत असता की स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. गेल्या जवळपास ९ वर्षांत कुणीही मला विचारले नाही की ‘तू कसा आहेस? असे कोहलीने सांगितले.
2014 मध्ये पहिल्यांदा मिळाले नेतृत्व
2014 मध्ये MS Dhoni दुखापतीमुळे बाहेर असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध Adelaide Oval येथे झालेल्या कसोटीत कोहलीने प्रथमच भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये तो कायमस्वरूपी कसोटी कर्णधार बनला होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने जानेवारी १५ २०२२ रोजी अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
कोहली-शास्त्री जोडीचा सुवर्णकाळ
रवि शास्त्री आणि कोहली यांच्या जोडीने भारतीय कसोटी क्रिकेटला नवी उंची मिळवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवत Border-Gavaskar Trophy जिंकली. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. त्याने 68 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 40 सामने जिंकले, तर त्याचा विजयाचा टक्का 58.82 इतका प्रभावी राहिला.