Wednesday, May 20, 2026

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला?

४८-२९-२३ चा फॉर्म्युला निश्चित; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यादीवर करणार शिक्कामोर्तब

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून रखडलेल्या आणि सत्ताधारी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिलेल्या 'शासकीय महामंडळ' वाटपाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. महायुतीमधील धुसफूस टाळण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना तातडीने सत्तेत वाटा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, भाजपसह मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे जागावाटप महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांमध्ये ४८-२९-२३ असा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर आता अंतिम यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमधील संख्याबळ लक्षात घेऊन महामंडळांचे वाटप खालील टक्केवारीनुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, भाजप ४८ टक्के महामंडळे, शिवसेना २९ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २३ टक्के महामंडळे दिली जातील. कोणत्या पक्षाला नेमके कोणते महामंडळ (उदा. सिडको, म्हाडा, एसटी) मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले, तरी आगामी उच्चस्तरीय बैठकीत कोणत्या महामंडळावर कोणाची वर्णी लावायची, याचे अंतिम वाटप थेट नावांसह निश्चित केले जाणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीमधील वरिष्ठ नेते, माजी आमदार आणि निष्ठावंत पदाधिकारी महामंडळांसाठी 'देव पाण्यात बुडवून' बसले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आता आपापल्या पक्षाच्या कोट्यातून महत्त्वाच्या महामंडळाची सूत्रे हस्तगत करण्यासाठी नेत्यांनी आत्तापासूनच मुंबईत मोर्चेबांधणी आणि अंतर्गत लॉबिंग सुरू केले आहे.

परिषद निवडणुकीनंतर प्रक्रियेला येणार वेग

सध्या राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १६ जागांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, येत्या १८ जून रोजी या जागांसाठी मतदान, तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. जर निवडणूक बिनविरोध झाली, तर १८ जून रोजीच ही धामधूम संपेल; अन्यथा २२ जूनपर्यंत राजकीय डाव-प्रतिडाव पाहायला मिळतील. सूत्रांच्या मते, विधान परिषदेचे मतदान पूर्ण होताच किंवा जागा बिनविरोध होताच, महामंडळ वाटपाच्या नियुक्त्यांचे आदेश जारी केले जातील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >