Wednesday, May 20, 2026

Agriculture Minister Dattatreya Bharane : शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा अडथळा नाही

Agriculture Minister Dattatreya Bharane : शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा अडथळा नाही

 कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; ३० जूनपूर्वी घोषणा होणार

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसून, येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील बळीराजासाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार दिली. "कर्जमाफी हा सरकारचा पूर्वनियोजित धोरणात्मक निर्णय असल्याने या प्रक्रियेत आचारसंहितेचा कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक असून, वित्तीय नियोजनाचा आढावा घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल," असेही त्यांनी सांगितले.

जून महिन्यात राज्यातील मुख्य खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात होते. या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीकामांसाठी नव्या पीक कर्जाची आवश्यकता असते. परंतु, जुन्या कर्जाच्या बोज्यामुळे अनेक शेतकरी बँकांच्या दारात थकबाकीदार ठरले आहेत. हीच अडचण ओळखून सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ३० जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना बँकांकडून पुन्हा नवीन पीक कर्ज मिळणे सुलभ होईल, असे मंत्री भरणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >