महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासोबतच देशात 'शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मंगळवारी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यात तब्बल २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, या क्षेत्रात तब्बल ६ लाख ५० हजार कोटी रुपयांची महागुंतवणूक होणार आहे. "स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्रात येणारी ही गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच मोठे बळ देणारी ठरेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, राज्यात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


मंत्रालयात आयोजित एका विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देशातील चार दिग्गज कंपन्यांसोबत या ऐतिहासिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिझनेसचे अध्यक्ष रंजय शरण प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या उपस्थितीत संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये करारांचे अधिकृत आदान-प्रदान करण्यात आले.


बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शाश्वत घटक आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर आणि अधिक वेगवान बनेल. ही गुंतवणूक केवळ वीज निर्मितीपुरती मर्यादित नसून, यामुळे राज्यातील तरुणांसाठी १ लाख २३ हजारांहून अधिक रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहील." तसेच कंपन्यांनी प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण तातडीने सुरू करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.



कोणत्या कंपनीची किती गुंतवणूक?


अदानी पॉवर लिमिटेड कंपनी राज्यात १ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, त्यातून ६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल. तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या १२ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज २ लाख कोटी रुपयांचीगुंतवणूक करणार आहे. यामधून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती व एक लाखाच्यावर रोजगार उपलब्ध होणार आहे. एनटीपीसी लिमिटेड १ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. यामध्ये ५ हजार रोजगार निर्मिती होईल.ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामधून पाच हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि ३ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.अशाप्रकारे राज्यात एकूण ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून २५ हजार ४०० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम