महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे
न म्हणजे स्वकष्टार्जित वस्तूपैकी स्वतःच्या इच्छेने उपकाराची व परतीची भावना न ठेवता दुसऱ्याला दिलेली वस्तू म्हणजे दान. दान हे गरजू माणसाला त्याची गरज लक्षात घेऊन दिले गेले पाहिजे. सदैव सत्कार्मात लीन असणाऱ्यांना प्रयत्नपूर्वक शोधून त्यांना दिलेले दान कधीही चांगले असते. पात्र व्यक्तीकडून याचना केल्यावर भगवंत समर्पणाच्या भावनेने व परम श्रद्धेने दिले जाते ते परमोत्तम दान असते त्याचे पुण्यफळ यथायोग्य मिळतेच. भगवद्गीतेत दानाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत.
१) सात्त्विक दान : कोणत्याही परतीची अपेक्षा न ठेवता, योग्य पात्र व्यक्तीला, योग्य वेळी, योग्य स्थळी दिलेले दान म्हणजे सात्त्विक दान. उदाहरणार्थ वृत्रासुराचा नाश करण्यासाठी दधीची ऋषींनी आपली हाडे इंद्राला वज्र बनवण्यासाठी दिली. हे दान योग्य माणसाला योग्य ठिकाणी योग्य वेळी दिले म्हणून सात्त्विक दान ठरते. २) राजसी दान : क्लेषपूर्वक बदलाची अपेक्षा ठेवून किंवा प्रतिष्ठेसाठी दिलेले दान म्हणजे राजसी दान. उदाहरणार्थ आपल्या सत्काराच्या अपेक्षेने किंवा लोकांनी आपल्याला मते द्यावी या अपेक्षेने केलेले दान हेही राजस दानच होय. हेही दानच आहे; परंतु ते मध्यम प्रतीचे मानले जाते. ३) तामसी दान : अयोग्य वेळी, अयोग्य पात्राला, तिरस्काराने व अपमान करून दिलेले दान म्हणजे तामसी दान होय.
उत्तम दानाने भगवान प्रसन्न होतात, तर अधम दानाने बली संतुष्ट होतात, असे वेदांचे जाणकार सांगतात.
समुद्रावर पावसाचा वर्षाव, तृप्त माणसाला भोजन देणे, समर्थ असलेल्या माणसाला दान देणे आणि ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी दिवे लावणे ही निष्फल दानाची लक्षणे आहेत.
दानाचे वर्गीकरण : दानाचे नित्यदान, नैमित्तिक दान, काम्य दान व विमलदान असे वर्गीकरण केले आहे.
१) नित्यदान : कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणालाही दिलेले दान म्हणजे नित्यदान होय. २) नैमित्तिक दान : पापक्षालन करण्यासाठी किंवा वाईट कर्माचा दोष निवारण्यासाठी केलेले दान म्हणजे नैमित्तिक दान होय. ३) काम्य दान : कोणता तरी उद्देश मनात ठेवून जसे संतती, विजय, वैभव, स्वर्गप्राप्ती आदी हेतूने केलेले दान याला काम्य दान असे म्हणतात. ४) विमलदान : परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वांनांना सत्त्वचित्ताने दिलेले दान म्हणजे विमलदान होय.
दानाचे काही प्रकार : धर्मशास्त्रात दानाला फार महत्त्व आहे. धर्मशास्त्र व पुराणात दानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. जसे अन्नदान, जलदान, अभयदान, विद्यादान, भूदान, तुलादान, वस्त्रदान, सुवर्णदान, औषध दान, तिला दान, कन्यादान इत्यादी. ज्यामुळे एखाद्याचा प्राण वाचेल ते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे सर्व दानात अन्नदान, जलदान, अभयदान, औषधीदान, त्यांना विशेष महत्त्व आहे.
विविध दानाचे पुण्य
पूर्वीच्या काळी राजे लोक तुला दान करीत असत. स्वतःच्या वजना एवढ्या वस्तूंचे दान करीत असतात. आजही अनेक जण त्यांच्या वाढदिवसानिमित्त अथवा अन्य धार्मिक कार्य प्रसंगी हे दान करतात. हे दान सर्व श्रेष्ठ मानले जाते. मनुष्याला जगण्यासाठी अन्न व पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून अन्नदान व जलदान या दानांना महत्त्वाचे स्थान आहे. नारद पुराणानुसार अन्नदान करणाऱ्याच्या कुलातील सर्व प्राणी नरकापासून दूर असतात. आपल्याला जेवणात आवडणारा पदार्थ दान केल्याने पितरांचा उद्धार होतो. जलदानाने लगेच तृप्ती होत असल्याने ते अन्नदानाहूनही श्रेष्ठ मानले जाते. जलदानाने अन्य पातकासह महापातकांचाही नाश होतो. विहिरीत तलाव आदी जलाशय निर्माण करणारा तसेच ते निर्माण करण्यास प्रेरणा देणारा असे दोघेही परमपुण्यवान असतात. या जलाशयातील पाणी एकाही तहानलेल्याने जरी प्राशन केले, तर निर्मात्याचे सर्व पाप नष्ट होते, असे नारद पुराणात सांगितले आहे.
भयग्रस्त प्राण्यांचे रक्षण करणाऱ्याला सर्व प्रकारच्या यज्ञाच्या पुण्याहूनही जास्त पुण्य मिळते. रोगी माणसाचे प्रेमाने रक्षण करणाऱ्याला पुण्य लाभते. गरीब व रुग्णाचे रक्षण करणाऱ्या वर विष्णू प्रसन्न असतात. माणसाला आसरा उपलब्ध करून देणाऱ्याला विष्णू आपल्या लोकात स्थान देतात. दुभत्या तसेच व्यालेल्या गाईचे दान करणाऱ्यास मिळणाऱ्या पुण्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. कन्यादान, गंध तसेच उत्तम फळाचे दान करणाऱ्यास ब्रह्म लोकांची, तर सुवर्णदान करणाऱ्यास विष्णू लोकांची प्राप्ती होते. रत्नजडीत सुवर्णदान तसेच शिवलिंगाच्या दानाला महादान म्हटले आहे. त्यांने मोक्षाची प्राप्ती होते. क्षीर, धृत, मधू आणि दही तसेच गाडी यांचे दान देणाऱ्यांना स्वर्गप्राप्ती होते, तर ऊसाचे दान दिल्याने ही स्वर्गसुख मिळते. गूळ आणि उसाच्या रसाचे दान दिल्याने मनुष्य क्षीरसागर प्राप्त करतो. गाईला चारा दिल्याने, मणी, पुष्पराग तसेच वस्त्र दान केल्याने रुद्र लोकाची प्राप्ती होते. अश्वदानाने अश्विनी कुमारांच्या लोकांची प्राप्ती होते, तर गजदानाने सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हशीच्या दानाने अपमृत्यू टळतो, तर योद्धांना जलपान करविल्याने सूर्य लोकाचे सुख मिळते. विद्यादानाने विष्णू लोकाची प्राप्ती होते, तर इंधनाच्या दानाने उपपातके नष्ट होतात.
निष्फल दान : दान मिळवण्यासाठी लबाडी करणारा, निर्दयी, ढोंगी, उचित कर्म न करणारा, परस्त्रीची अभिलाषा बाळगणारा, दुसऱ्याचे द्रव्य लुबाडणारा, कृतघ्न, मायावी, सदा याचना करणारा, द्रव्याच्या लालसेने विष्णू भक्तीचे ढोंग करणारा, संध्यावंदना न करणारा, चुगलखोर, ग्रीष्मऋतू शिवाय अन्य ऋतूत दिवसा झोपणारा, दिवसा मैथून करणारा, संध्या समयी भोजन करणारा अशांना दिलेले दान निष्फल होते. स्त्रीची कमाई खाणारा, मदिरा प्राशन करणारा, पापी लोकांची निंदा करणारा सज्जनही दानास अपात्र आहे. तसेच त्यांच्याकडून दान घेऊही नये असे नारद पुराणात सांगितले आहे. सद्यस्थितीत रक्तदान व अवयव दान हेही उत्कृष्ट दान मानले जातात.






