महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली. पाकिस्तानमधून गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांची सूत्रे हलवणाऱ्या शहजाद भट्टी (Shahjad Bhatti) आणि डोगर गँगशी संबंधित संशयास्पद व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील सांताक्रूझ, अंधेरी, घाटकोपर आणि मालाडसह ठाणे, कल्याण, नालासोपारा आणि मीरा रोड अशा १९ हून अधिक संवेदनशील ठिकाणी एटीएसच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकले.
पुणे, नागपूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यात धाडसत्र
ही कारवाई केवळ मुंबई किंवा एमएमआर क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती. एटीएसने आपला मोर्चा पुणे, नागपूर, अकोला, नांदेड, मालेगाव, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांकडेही वळवला. राज्यातील एकूण ४० हून अधिक ठिकाणी राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सीमेपलीकडून भारतात कारवाया घडवून आणणाऱ्या गँगस्टर्सच्या समर्थकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईने गुन्हेगारी विश्वाचे धाबे दणाणले आहेत.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान ५६ ...
ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडियाचा भयानक वापर उघड
या छापेमारीदरम्यान एटीएसने ५७ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे भट्टी सिंडिकेट तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सॲप आणि चक्क ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) ॲप्लिकेशन्सचा वापर करत होते. या ॲप्सच्या माध्यमातून संशयित आपली खरी ओळख लपवून तरुणांचे 'ब्रेनवॉश' करत असल्याचे पुरावे एटीएसला मिळाले आहेत.
ग्लॅमर आणि पैशांच्या आमिषाने तरुणांना दहशतवादाच्या वाटेवर नेले
शहजाद भट्टी आणि त्याचे हस्तक समाजातील बेरोजगार तरुण, व्यावसायिक आणि मध्यमवयीन व्यक्तींना लक्ष करत होते. त्यांना खंडणी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि 'टार्गेट किलिंग'साठी तयार केले जात होते. गुन्हेगारी जगातील चैनीचे आयुष्य आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारे व्हिडिओ दाखवून तरुणांना आकर्षित केले जात असे. या भरतीचा मुख्य उद्देश भारतात 'स्लीपर सेल' तयार करणे आणि दहशतवादी कारवायांसाठी मनुष्यबळ उभे करणे हा होता.
मोबाईल, लॅपटॉप आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
छापेमारीत एटीएसने मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल स्टोरेज डिव्हाइसेस आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या एटीएसचे तज्ज्ञ या उपकरणांमधील एनक्रिप्टेड चॅट्स आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीचा सखोल तपास करत आहेत. या सिंडिकेटला पाकिस्तान आणि दुबईतून कोणी आणि कसा अर्थपुरवठा केला, याचा शोध घेण्यासाठी संशयास्पद बँक खात्यांचीही तपासणी सुरू आहे.
गाझियाबाद हेरगिरी प्रकरणाशी महत्त्वाचे कनेक्शन
तपासादरम्यान असे दिसून आले की, शहजाद भट्टी आणि डोगर गँगचा संबंध गाझियाबाद येथील 'सीसीटीव्ही हेरगिरी' प्रकरणाशी आहे. या प्रकरणात संशयितांनी दिल्ली कॅन्टोन्मेंट आणि महत्त्वाच्या रेल्वे मार्गांजवळ सौरऊर्जेवर चालणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यांद्वारे भारतीय लष्कराच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण पाकिस्तान आणि दुबईतील हँडलर्सना पाठवले जात होते, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.
लष्करी तळ आणि धार्मिक स्थळे टार्गेटवर; कट उधळला
एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, भट्टी नेटवर्कच्या माध्यमातून दिल्लीतील ऐतिहासिक मंदिर, हायवेवरील प्रसिद्ध धाबे आणि हिसार येथील लष्करी तळांवर हल्ले करण्याचा कट रचला गेला होता. मे २०२६ मध्ये पंजाबमध्ये झालेल्या स्फोटांमागेही याच टोळीचा हात असल्याचा संशय आहे. मात्र, एटीएसच्या या मोठ्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून घातपाताचा कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.
कोण आहे 'मास्टरमाइंड' शहजाद भट्टी?
शहजाद भट्टी हा लाहोरचा रहिवासी असून त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI शी अत्यंत जवळचे संबंध आहेत. तो गेल्या अनेक वर्षांपासून दुबईतून आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवत आहे. पाकिस्तान, यूएई आणि युरोपातील देशांमध्ये त्याचे सतत वास्तव्य असते. भारतात दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्यासाठी तो सध्या सर्वात मोठा 'रिमोट कंट्रोल' मानला जात आहे.