Suvendhu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये 'अधिकारी' राज! शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी (R.N. Ravi) यांनी आज सकाळी ११ वाजता शुभेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा भव्य शपथविधी सोहळा कोलकाता येथील अत्यंत प्रसिद्ध अशा 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर पार पडला. शुभेंदू अधिकारी  यांच्यासोबत आणखी आमदारांनी देखील मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. हे मैदान बंगालच्या राजकीय इतिहासातील अनेक विशाल आणि महत्त्वपूर्ण राजकीय सभांचे साक्षीदार राहिले आहे. आता याच ऐतिहासिक मैदानावरून बंगालच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे.



दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि भाजपचे शक्तीप्रदर्शन


पूर्व भारतातील भाजपचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि लक्षवेधी विजय मानला जात आहे. या विजयाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जणू संपूर्ण दिल्लीच आज कोलकातामध्ये अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, (Amit Shah) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Naveen) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या दिमाखदार सोहळ्याला उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीतून भाजपने केवळ विजयाचा आनंदच साजरा केला नाही, तर एक भक्कम राजकीय संदेशही दिला आहे.



शपथविधीसाठी 'रवींद्र जयंती'चा जाणीवपूर्वक मुहूर्त


या संपूर्ण सोहळ्यात सर्वात लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे भाजपने निवडलेला दिवस. भाजपने या शपथविधीसाठी ९ मे म्हणजेच 'रवींद्र जयंती'चा (गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती) मुहूर्त निवडला. ही केवळ योगायोग नसून, बंगाली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा आम्ही सन्मान करतो, असा एक जाणीवपूर्वक आणि स्पष्ट सांस्कृतिक संदेश भाजपने बंगालच्या जनतेला दिला आहे. एकूणच, ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या सत्तेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपने मिळवलेला हा विजय आणि शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी, हा भारतीय राजकारणातील एक मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.


शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रक्रियेबद्दल माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, "मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला नाही." यावरून पक्षात अधिकारी यांच्या नेतृत्वाला असलेला भक्कम पाठिंबा स्पष्ट होतो.



एक नाट्यमय राजकीय प्रवास


शुभेंदू अधिकारी यांची राजकीय वाटचाल एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशीच आहे. ते एकेकाळी तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत गोटातील अत्यंत महत्त्वाचे नेते आणि पक्षाचे संकटमोचक मानले जायचे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी बंड पुकारले आणि तृणमूलला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. नुसता प्रवेशच केला नाही, तर त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान दिले आणि ते मोडूनही काढले.



भवानीपूरमध्ये दीदींचा १५ हजार मतांनी दणदणीत पराभव


या निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही अत्यंत हाय-व्होल्टेज मतदारसंघांमधून निवडणूक लढवली. भवानीपूर हा खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, अधिकारी यांनी सर्व राजकीय आडाखे खोटे ठरवत ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात तब्बल १५ हजारांहून अधिक मतांच्या घसघशीत फरकाने दारुण पराभव केला. या विजयामुळे ते राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठे 'जायंट किलर' ठरले आहेत.



भाजपची ऐतिहासिक लाट; तृणमूलचा सुपडा साफ


पश्चिम बंगालच्या जनतेने यंदा भाजपच्या बाजूने स्पष्ट आणि भक्कम कौल दिला आहे. विधानसभेच्या एकूण २९३ जागांपैकी भाजपने तब्बल २०७ जागांवर दणदणीत विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा अक्षरशः सुपडा साफ झाला असून, त्यांचा पक्ष अवघ्या ८० जागांपर्यंत मर्यादित राहिला आहे. तृणमूल काँग्रेससाठी हा एक अनपेक्षित आणि मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Comments
Add Comment

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

EPFO : आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच सुविधा होणार सुरू

Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी

kedarnath yatra animal cruelty : भक्तीच्या नावाखाली क्रूरतेचा कळस! केदारनाथमध्ये मृत घोड्याला फरफटत नेले आणि...हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

उत्तराखंड : उत्तराखंडमधील निसर्गरम्य आणि पवित्र 'छोटा चार धाम' पैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये सध्या यात्रेची