दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या नव्या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा 'थलपती' विजय (Thalapathy Vijay ) यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अगदी हाकेच्या अंतरावर असताना त्यांच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अचानक अनपेक्षित अडथळे निर्माण झाले आहेत. ठरल्याप्रमाणे शनिवारी (९ मे) सकाळी ११ वाजता होणारा त्यांचा बहुचर्चित शपथविधी सोहळा आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. ऐन मोक्याच्या क्षणी 'विदुथलाई चिरुथिगल काची' (व्हीसीके) या मित्रपक्षाने पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण केल्याने आणि 'इंडियन युनियन मुस्लिम लीग' (आययुएमएल) ने त्यांच्या गटात जाण्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्याने विजय यांच्या तंबूत चिंतेचे वातावरण आहे. राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमताच्या आकड्यासाठी त्यांना अद्याप दोन आमदारांची नितांत आवश्यकता आहे.
कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ ...
'११८' चा पल्ला गाठताना दमछाक
तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच सस्पेन्स पाहायला मिळत आहे. २३४ सदस्यांच्या विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा '११८' हा जादुई आकडा गाठणे अनिवार्य असते. मात्र, विजय यांच्या आघाडीचा गाडा ११६ या आकड्यावरच अडखळला आहे. विजय यांनी तब्बल ११६ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे अधिकृत पत्र राज्यपालांना सुपूर्द करून सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरी विजयाचा मुकुट घालण्यासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित २ आमदारांची जुळवाजुळव करताना त्यांची आणि त्यांच्या रणनीतीकारांची चांगलीच दमछाक होत आहे. या आगीत तेल ओतण्याचे काम 'आययुएमएल'ने केले असून, आपण ठामपणे 'द्रमुक' (DMK) आघाडीसोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे विजय यांच्या सत्तेच्या समीकरणातील अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
मध्यरात्रीचे हाय-व्होल्टेज सत्तानाट्य
शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच चेन्नईमध्ये कमालीच्या वेगवान आणि नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्तेची कोंडी फोडण्यासाठी खुद्द विजय यांनी रात्रीतून तब्बल तीन वेळा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. पण, ११ आमदारांचे भक्कम संख्याबळ असलेल्या 'व्हीसीके' पक्षाचे अधिकृत पाठिंब्याचे पत्र जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत राज्यपालांनी शपथविधीची घोषणा राखून ठेवली आहे. यातच सर्वांची धाकधूक वाढवणारी बातमी म्हणजे 'व्हीसीके'चे सर्वेसर्वा थोल. थिरुमावलवन यांचा फोन अचानक 'नॉट रिचेबल' येत आहे. त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी 'टीव्हीके'चे बडे नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत आमदारांचा घोडेबाजार होऊ नये, यासाठी काँग्रेसने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. त्यांनी तातडीने आपल्या पाच आमदारांना सुरक्षित स्थळी, म्हणजेच शेजारच्या कर्नाटक राज्यात (बेंगळुरू) हलवले आहे. आता संपूर्ण राज्याचे लक्ष 'व्हीसीके'च्या शनिवारी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे लागले असून, सत्तेच्या या सारीपाटात थिरुमावलवन यांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे.