कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shhivaji Movie) या ऐतिहासिक चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला राज्यभरातून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे लाडके अभिनेते-दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी कोल्हापूरला विशेष भेट दिली. यावेळी या दांपत्याने करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
अंबाबाईच्या चरणी नतमस्तक
रितेश देशमुख यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या शिवमय प्रवासाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेण्यासाठी देशमुख दांपत्याने अंबाबाईच्या चरणी माथा टेकला. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करत खणा-नारळाने ओटी भरली आणि चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मंत्री नितेश राणे यांचा इशारा; ‘बापू अभिमान आहे!’ म्हणत संग्राम भंडारे यांना दर्शवला पाठिंबा मुंबई : " हिंदूराष्ट्रात राहून साधू-संतांबद्दल खालच्या ...
चाहत्यांचा तुफान उत्साह
रितेश आणि जेनेलिया कोल्हापुरात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या चाहत्यांनी अंबाबाई मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी कोल्हापूरकरांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. देशमुख दांपत्यानेही हात हलवून आणि स्मितहास्य करत चाहत्यांच्या या प्रेमाचा स्वीकार केला.
विलासराव देशमुखांच्या आठवणीने रितेश भावूक
देवीच्या दर्शनानंतर रितेश आणि जेनेलिया यांनी मंदिर परिसरातच उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रितेश देशमुख यांनी कोल्हापूरकरांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "माझे वडील, राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्यावर कोल्हापूरकरांनी नेहमीच जिवापाड प्रेम केले. आज तेच आणि तसलेच भरभरून प्रेम कोल्हापूरची जनता मला आणि माझ्या चित्रपटाला देत आहे. हे पाहून माझे हृदय भरून आले आहे." आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी कोल्हापूरकरांचे विशेष आभार मानले. 'राजा शिवाजी' चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवले आहे. कोल्हापूरच्या या दौऱ्यातून आणि लोकांच्या उदंड प्रतिसादातून चित्रपटाची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.