Wednesday, May 6, 2026

PM Narendra Modi : महाराष्ट्राच्या विकासात पंतप्रधान मोदींचे योगदान अतुलनीय

PM Narendra Modi : महाराष्ट्राच्या विकासात पंतप्रधान मोदींचे योगदान अतुलनीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दिनानिमित्त पाठवलेल्या शुभेच्छा पत्राला उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांना आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्राबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या विकासात पंतप्रधान मोदींचे योगदान अतुलनीय आहे, असे फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि वारकरी संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजे विचारांचा आणि सुशासनाचा वारसा आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानांनी रायगडावर येऊन अभिवादन केल्याची आठवण काढत, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आणि सर्वसामान्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांतून शिवरायांच्या विचारांची वाटचाल दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाची आणि सहकार्याची विशेष स्तुती केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवरायांचे ११ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करणे, युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि दावोस येथील आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व यामध्ये पंतप्रधानांची भूमिका मोलाची राहिली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यातही एनडीए सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधानांनी पुढाकार घेतला. अटलसेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, तसेच गडचिरोलीचे ग्रीन स्टील हब म्हणून होणारे रूपांतर या सर्व विकासात्मक कामांमध्ये पंतप्रधानांचा पाठिंबा राहिला आहे. जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये समावेश होणारे आणि भविष्यात १० लाख रोजगार निर्माण करणारे वाढवण बंदर हे राज्याच्या आर्थिक विकासाचे केंद्र ठरेल, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र मोदींच्या पाठिशी

पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला विशेष पॅकेज आणि सिंचन प्रकल्पांसाठी मदत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र पंतप्रधानांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >