नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ निमित्त नाशिक महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना, या कामांमधील समन्वयाचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी सुहास फरांदे व आमदार सीमा हीरे यांनी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या.
शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून येत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. विकासकामे सुरू करताना आवश्यक असलेले माहिती फलक (बोर्ड) अनेक ठिकाणी लावले जात नसून, ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने रस्ते खोदकाम सुरू असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच काँक्रीट रस्ते करताना महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याचा समावेश नसल्यामुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार असून, त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
याशिवाय गटार, पाणीपुरवठा, एमएनजीएल व इतर विभागांमध्ये समन्वय नसल्याने एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. काही ठिकाणी सुरक्षेची योग्य उपाययोजना न केल्याने अपघात होऊन दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही समोर आली आहे. रस्ते अचानक खोदल्यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून काम अपूर्ण अवस्थेत दिवसानुदिवस सोडून दिले जात असून, काही ठिकाणी केवळ ठराविक वेळेतच काम केले जात आहे. त्यामुळे खोदकाम २४x७ पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.






