मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईने नऊ साखळी सामन्यांपैकी फक्त दोन जिंकले आणि सात सामने गमावले. यामुळे फक्त चार गुणांसह मुंबईचा संघ गुणतक्त्यात नवव्या स्थानावर आहे. तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची ही कामगिरी बघून चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे.
चेन्नई विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. हा सामना चेन्नईने आठ विकेट राखून जिंकला. मुंबईला नाणेफेक जिंकूनही या सामन्यात वीस षटकांत सात बाद १५९ धावा एवढीच मजल मारता आली होती. चेन्नईने १८.१ षटकांत २ गडी गमावून १६० धावा केल्या आणि सामना खिशात टाकला.यामुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. भारताचे माजी निवड समिती सदस्य श्रीकांत यांनी प्लास्टिक कॅप्टन म्हणत हार्दिकवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले श्रीकांत ?
श्रीकांतने हार्दिकच्या फलंदाजीच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्मा बाद झाल्यावर हार्दिक सहाव्या क्रमांकावर आला. फलंदाजी करताना तो संघर्ष करताना दिसला. तो २३ चेंडूंमध्ये फक्त १८ धावा करू शकला. अंशुल कंबोजच्या चेंडूवर तो डेवहाड ब्रेवीसच्या हाती झेल देऊन परतला. संपूर्ण खेळीत दोन चौकार मारणारा हार्दिक शेवटच्या षटकात बाद झाला. या संदर्भात एका यूट्यूब चॅनलवर चर्चा करताना,श्रीकांत म्हणाले की, जेव्हा संघाचा रनरेट सातत्याने घसरत होता, तेव्हा हार्दिक काय करत होता ? कर्णधार म्हणून धावगती वाढवण्यासाठी, धावा वाढवण्यासाठी प्रयत्न करताना तो दिसला नाही, अशी टीका श्रीकांत यांनी केली. सध्या श्रीकांत यांच्या वक्तव्याची क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. चेन्नई विरुद्ध हरल्यामुळे मुंबईच्या पुढील फेरीत जाण्याच्या आशा संपल्या आहेत.