हैदराबाद : आयपीएल २०२६ मध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल.
या हंगामात दोन्ही संघांमध्ये हा दुसरा सामना असणार आहे. यापूर्वी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने ६५ धावांनी विजय मिळवला होता. यंदाच्या हंगामात हैदराबादने ९ पैकी ६ सामने जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सुरुवातीचे तीन सामने गमावल्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकत हंगामात दमदार पुनरागमन केले आहे.
दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स आठव्या स्थानावर असून ८ पैकी केवळ २ सामने जिंकू शकले आहेत. त्यामुळे हा सामना कोलकातासाठी करो या मरोचा ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास पुढच्या टप्प्यात पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपुष्टात येऊ शकतात.
हेड-टू-हेडमध्ये कोलकाताचा वरचष्मा
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कोलकाता नाईट रायडर्स ने १९ सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादला ११ विजय मिळाले आहेत. एक सामना टाय झाला होता आणि तो सुपर ओव्हरमध्ये कोलकाताने जिंकला. हैदराबादच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये सात सामने झाले असून त्यात हैदराबादने ३ तर कोलकाताने ४ सामने जिंकले आहेत.
अभिषेक-मलिंगा फॉर्मात
हैदराबादचा अभिषेक शर्मा फॉर्मात आहे. त्याने ९ सामन्यांत २०९.३५ च्या स्ट्राइक रेटने ४२५ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत ईशान मलिंगाने ९ सामन्यांत १५ विकेट घेत प्रभावी कामगिरी केली आहे. या दोघांकडून आजच्या सामन्यातही प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच ट्रॅव्हिस हेडनेही मुंबईविरुद्ध अर्धशतक झळकावत हंगामात पुनरागमन केले आहे.
रिंकूवर कोलकाताची मदार
कोलकातासाठी रिंकू सिंहने ८ सामन्यांत २१५ धावा केल्या. यात दोन अर्धशतकही झळकावली आहेत. या हंगामात जेव्हा - जेव्हा रिंकूने मोठी खेळी केली आहे तेव्हा-तेव्हा संघाला विजय मिळाला आहे. गोलंदाजीत कार्तिक त्यागीने ८सामन्यांत ९ विकेट घेत संघाला चांगली साथ दिली आहे. या दोघांच्या एवढा कोणताही खेळाडू या हंगामात चांगली कामगिरी करू शकला नाही.
कशी आहे खेळपट्टी ?
राजीव गांधी स्टेडियम येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर आतापर्यंत ८७ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ३८ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले, तर ४८ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.
या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या सहा बाद २८६ धावा अशी असून ती सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध केली होती. अशा खेळपट्टीवर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडची जोडी किती मोठी भागीदारी उभारते याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.