मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष संजीवनी अभियान अंतर्गत मुंबईतील तब्बल १०७१ झाडांना काँक्रीटच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवती अनेक वर्षांपासून असलेले सिमेंट-काँक्रीट काढून टाकल्यामुळे या झाडांना पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी व पोषकद्रव्ये शोषण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या झाडांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने वृक्ष संजीवनी अभियान हाती घेण्यात आले आहे. मागील एक ते तीस एप्रिल २०२६ या कालावधीत झाडांच्या मुळावरील सिमेंट काँक्रिटचा थर, झाडांना ठोकलेले खिळे, वायर, पोस्टर हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. झाडांच्या खोडांमध्ये जाहिराती, बॅनर्स आणि केबल्स लावण्यासाठी ठोकण्यात आलेले तब्बल ४,२४० खिळे काढून टाकण्यात आले. या खिळ्यांचे आणि केबल्सचे एकत्रित वजन ५० किलोपेक्षा अधिक असल्याचे समोर आले. खिळ्यांमुळे झाडांना होणारी जखम, संसर्ग आणि हानी टाळण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
याशिवाय, झाडांचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी १,१०२ पोस्टर्स हटवण्यात आले. झाडांवर अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे केवळ सौंदर्यच नाही, तर झाडांच्या खोड आणि सालीलाही नुकसान होत होते. या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांचे सौंदर्यही अधिक खुलले आहे.
मुंबईतील तब्बल १०७१ झाडांना काँक्रीटच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवती अनेक वर्षांपासून असलेले सिमेंट-काँक्रीटचा थर काढून टाकल्यामुळे या झाडांना पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी व पोषकद्रव्ये शोषण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे काँक्रीटमुळे झाडांच्या मुळांना हवा व पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटते आणि झाडे कमकुवत होतात. या मोहिमेमुळे झाडांच्या आरोग्यात सकारात्मक बदल अपेक्षित आहे.
या संपूर्ण उपक्रमात ४१४ विद्यार्थी, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शहरातील हरित संपत्तीचे जतन करण्यात मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.